सुशील थोरात, साम टीव्ही
अहिल्या नगरच्या राहुरीत घडलेल्या महापुरुष पुतळा विटंबना घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, मागणीसाठी सुरू असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं अन्नत्याग उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित झालंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. आता आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय.
अहिल्यानगरच्या राहुरीत 26 मार्च रोजी दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक झाली नव्हती. त्यामुळे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. तिसऱ्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांची प्रकृती खालावली. त्यांचं वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आलं होतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून उपोषण स्थगित करण्यात आलं.
अंबादास दानवे म्हणाले, 'महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहे. त्यांना एखादा आरोपी शोधणे त्यांच्यासाठी अवघड नाही. काही दिवसांपूर्वी एका मंत्र्यांचा मुलगा थायलंडला निघाला होता. त्यावेळी पोलिसांनी, शासनाने ठरवले आणि विमानाचा मार्ग बदलून माघारी आणले. या प्रकरणाला 20 दिवस उलटूनही राहुरीत पुतळा विटंबनेतील आरोपी सापडत नसेल, तर त्याचा जाब विचारावाच लागणार आहे'.
'कोरटकर, सोलापूरकर यांची उदाहरणे समोर आहेत. त्यामुळे राहुरी प्रकरणातही शंका उपस्थित होत आहे. 48 तासांत घटनेचा तपास लागला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून इथल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. घटनेचा तपास लागला नाही, हा लढा राज्यभर नेऊ, असा इशाराअंबादास दानवे यांनी दिला आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पुतळा विटंबन प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधलाय. अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. सोलापूरकर, कोरटकर दोन्ही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कशा पद्धतीने बोलले. हे सर्व सगळं जाणीवपूर्वक चाललं आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत. राहुरीची घटना याचाच भाग असावी अशीच वाटतेय. फोटो बघितल्यानंतर राहुरीत पुतळा विटंबन कुणी वेड्याने केले असे वाटत नाही, तर जाणीवपूर्व केल्याचे दिसत आहे. सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी देखील सरकारवर निशाणा साधत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.. 'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे हा महाभयंकर गुन्हा आहे. 20 दिवस उलटूनही आरोपी सापडत नाही. ही बाब खेदाची गोष्ट आहे. पोलिसांना आरोपीचा तपास लागत नसेल, तर उपोषण करण्यापेक्षा जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करू, असा इशारा लंके यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.