नंदुरबार : नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल असल्याने केंद्र शासनाच्या विविध योजना व जिल्ह्यातील प्रत्येक योजनेचा निधी योग्यरीतीने वापर करून खऱ्या लाभार्थ्यापर्यंत लाभ देऊन कुपोषणासारखा कलंक पूर्णपणे कसा मिटवता येईल व विकास कामे गतीने करण्यासाठी प्रयत्न राहील. तसेच जिल्ह्यात उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करून विकास कामांना गती देऊन प्रत्येक नागरिकाची समस्या सुटावी हीच प्राथमिकता राहील; अशी प्रतिक्रिया मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. (Nandurbar News Vijatkumar Gavit)
नंदुरबार विधानसभेचे भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने शपथविधीनंतर नंदुरबार जिल्ह्यात आल्यावर त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. आज नवापूर तालुक्यात त्यांचे समर्थक व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानाचीही जनजागृती करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे बघितले जाते. नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा आदिवासी नंदुरबार जिल्हा निर्मिती करण्यात त्यांचा मोठा हात राहिलेला आहे. आजपर्यंत महाराष्ट्र शासनात विविध विभागाचे मंत्रीपद सांभाळल्याने मंत्रिमंडळात कोणत्याही विभागाचं खाते मिळेल ते उत्कृष्ट व जबाबदारीने पार पाडणार असे वक्तव्य डॉ. गावित यांनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.