संजय सुर्यवंशी, साम टीव्ही
पुण्यातील मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. राज्यातील नांदेड जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणातील गोदावरी नदीपात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर येथील श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. पाच भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. मृत्यू पावलेले भाविक तेलंगणा राज्यातील आहेत. पाच जणांच्या मृत्यूने देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगाना राज्यातील श्रीक्षेत्र बासर येथील श्री सरस्वती देवीच्या दर्शनासाठी हैदराबादमधील चिंतल बाजार येथील एक कुटुंब आलं होतं. या कुटुंबात १८ जण होते. दर्शनापूर्वी गोदावरी नदीत असलेल्या बेटावर गेले. त्यावेळी नदीपात्राच्या पाण्यात अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
मृत्यू पावलेले सर्वजण हैदराबाद शहरातील दिलसुख नगर भागातील चिंतल बाजार परिसरातील रहिवासी आहेत. जीवरक्षक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृत्यू पावलेल्यांपैकी सर्वजण १७ ते १८ या वयोगटातील आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुण्यातील इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेले. त्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्याच्या मावळमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.