पराग ठोबळे, साम टीव्ही नागपूर
लग्न समारंभाचा मंडप सजला, नवरदेव-नवरी दोघेही स्टेजवर आले. वऱ्हाडी मंडळींनी अक्षदाही घेतल्या. आता भटजी शुभमंगल सावधान म्हणणार तोच मंडपात पोलिसांची एन्ट्री झाली. त्यांनी स्टेजवर जाऊन नवरीला एक प्रश्न विचारला अन् अवघ्या दोन मिनिटातच लग्न मोडलं. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार नागपूर शहरात घडला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या लग्नसराईचा (Wedding) हंगाम जोमात सुरू आहे. त्यामुळे लग्नमंडपात घडणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. आता अशाच एका लग्नसमारंभातील हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. लग्नसोहळा सुरू असताना अचानक लग्नमंडपात पोलिसांची एन्ट्री झाली. पोलीस थेट नवरदेव-नवरीजवळ पोहोचले, त्यांना केवळ एक प्रश्न विचारला आणि यानंतर हे लग्न थांबवण्यात आलं.
नागपूरच्या कळमना परिसरातील (Nagpur News) विजयनगर भागात गुरुवारी (ता. ४) एक लग्नसमारंभाचा कार्यक्रम होता. यासाठी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून मुलाची वरात नागपुरात दाखल झाली होती. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना अचानक पोलिसांसह जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पथकाने लग्नमंडपात धाड टाकली.
अधिकाऱ्यांनी नवरी मुलीची आई आणि वडिलांकडे तिच्या वयाचा दाखला अन् कागदपत्रे मागितली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी नवऱ्या मुलीला जन्मतारीख विचारली असता, ती अल्पवयीन असल्याचे निर्दशनात आले. मुलीचे वय अवघे १५ वर्ष होते.
बाल संरक्षण पथकाने आई-वडिलांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देऊ नये, हे बेकायदेशीर असल्याचं सांगत समजूत काढली. यानंतर घरी आलेली वरात परतीच्या मार्गावर गेली आणि अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.