महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय. यापुढे आयोगाच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (Computer Based Test - CBT) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. यासोबतच पूर्व परीक्षेचा निकाल २१ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे आणि ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आयोगाने निश्चित केले आहे.
ही माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आयोगाच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख उपस्थित होते.
यापूर्वी एमपीएससीच्या परीक्षांचे निकाल आणि त्यानंतरची भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी आयोगाने पूर्व परीक्षांचे निकाल शक्य तितक्या लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं की, आता प्रत्येक पूर्व परीक्षेचा निकाल २१ दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकालही अवघ्या २२ दिवसांत प्रसिद्ध करण्यात आला असून, पुढील काळात हा कालावधी आणखी कमी करून २१ दिवसांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न राहणार आहे.
फक्त निकालच नव्हे, तर संपूर्ण भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावरही आयोगाने भर दिला आहे. यापुढे ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मुलाखत असलेल्या पदांसाठी निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. तर ज्या पदांसाठी केवळ लेखी परीक्षा घेतली जाते, त्या भरतीची प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण करण्याचं नियोजन आयोगाने केलंय.
आयोगाने स्पष्ट केलंय की, सीबीटी पद्धतीचा निर्णय फक्त पूर्व परीक्षांसाठीच लागू असेल. राज्यसेवा तसेच गट 'अ', गट 'ब' आणि गट 'क'च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने घेतली जाणार आहे.
सीबीटी आणि नॉर्मलायझेशन सिस्टीम ही काही नवीन नसल्याचंही अध्यक्ष भीमनवार यांनी स्पष्ट केलंय. एमपीएससीने आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा या पद्धतीने यशस्वीपणे घेतल्या आहेत. ही सिस्टीम वैज्ञानिक असून न्यायालयानेही तिला मान्यता दिलीये. देशभरातील अनेक भरती संस्थांकडून हीच पद्धत वापरली जात असल्याचे त्यांनी सांगितलं.
अध्यक्ष भीमनवार यांनी सांगितलं की, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दरवर्षी लाखो उमेदवारांच्या परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) नेदेखील सुमारे १ कोटी उमेदवारांच्या भरती परीक्षा याच प्रणालीद्वारे यशस्वीपणे घेतल्या आहेत.
याशिवाय महाराष्ट्रातील स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) सेल ने अलीकडेच १६.३० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेतल्या आहेत. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्येही हीच प्रणाली वापरली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.