मान्सूनबाबत मोठी अपडेट
मान्सून पुढच्या २४ तासांत अंदमानात दाखल होणार
केरळमध्ये २६ मेपर्यंत दाखल होणार
पुढचे ४ दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून वाढत्या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. प्रमुख शहरातील तापमानात देखील कमालीची वाढ झाली आहे. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. शेतकऱ्यांपासून सर्वजण पावसाची वाट पाहत आहेत. अशातच मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मान्सून येत्या २४ तासांत अंदमानमध्ये धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर हळूहळू पुढे सरकत २६ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण अंदमानात तयार झाले आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात तसंच अंदमानात ढगांचे प्रमाण वाढले आहे. त्याचसोबत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांत मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. हे पोषक वातावरण असेच कायम राहिल्यास मान्सून २६ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. केरळनंतर मान्सून पुढच्या सात ते आठ दिवसांत कोकण किनारपट्टीत पोहचेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
- २०२० मध्ये हवामान खात्याने ५ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण मान्सून १ जून रोजी दाखल झाला.
- २०२१ मध्ये हवामान खात्याने ३१ मेपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण मान्सून ३ जून रोजी दाखल झाला.
- २०२२ मध्ये हवामान खात्याने २७ मेपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. मान्सून केरळमध्ये २९ मे रोजी दाखल झाला.
- २०२३ मध्ये हवामान खात्याने ४ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण मान्सून ८ जून रोजी दाखल झाला.
- २०२४ मध्ये हवामान खात्याने ३१ मेपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण मान्सून ३० मे रोजी दाखल झाला.
- २०२५ मध्ये हवामान खात्याने २७ मेपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण मान्सून २४ मे रोजी दाखल झाला.
राज्यात पुढचे ४ दिवस काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणसह, गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान जळगाव ४५,अकोला ४५.६ उर्वरित महाराष्ट्रात ४० अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे. त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. येत्या ४ दिवस काही जिल्ह्यात कमी तापमान असेल त्यामुळे वादळी पावसाची शक्यता आहे.
सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि आसपासच्या जिल्ह्यात पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण,सिंधुदुर्ग रत्नागिरीसह गोव्यात ३ ते ४ दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.