वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणात मृतक संतोष बकाल यांच्या सख्ख्या भावासह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
१३ जून रोजी संतोष बकाल यांचा मृतदेह महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता; तर त्यांची पत्नी वर्षा उर्फ इंद्रायणी बकाल आणि दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले होते. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर मृतक संतोष बकाल यांचे मेहुणे म्हणजेच वर्षा बकाल यांचे भाऊ सुधाकर सुभाष इंगोले यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, संतोष बकाल यांच्या नावावरील शेती, जमिनीतील हिस्सा आणि पैशांच्या व्यवहारावरून गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादातून संतोष बकाल यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. तसेच त्यांना शिवीगाळ करणे, त्यांचा अपमान करणे आणि त्यांच्यावर दबाव टाकणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी महादेव उर्फ महादा तुकाराम बकाल, उर्मिला महादा बकाल, पंकज महादा बकाल आणि भगवान उर्फ सावन महादा बकाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी महादेव बकाल याला पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.