उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा तीव्रतेचा स्तर कमी-जास्त होत असून, पर्वतीय भागांमध्ये अजूनही कडाक्याची थंडी कायम आहे. मात्र, मैदानी भागांमध्ये तापमान काहीसे वाढल्याचे दिसून येत आहे. पर्वतीय भागांतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भागात गारवा टिकून आहे. त्याचवेळी, दक्षिण भारतात किनारपट्टी भागांवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे, ज्यामुळे हवामानात बदल होताना दिसत आहेत.
मध्य भारत आणि महाराष्ट्रातही तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. या बदलांमुळे संपूर्ण देशात हवामान अस्थिर झाले असून थंड आणि उष्णतेच्या मिश्रणामुळे लोक विविध परिस्थितींना सामोरे जात आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात येत्या दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. पूर्वेकडून मुंबईकडे वाहणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे शुक्रवार ते रविवार दरम्यान शहराचे तापमान ३५ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
मुंबईत सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील बांधकामे आणि काँक्रिटीकरणामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपण्याची आवश्यकता आहे. विशेषतः दुपारी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये तापमान वाढीचा इशारा दिला आहे.
थंडी कमी होऊन तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. दुपारच्या वेळेस वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता जाणवेल, विशेषतः मैदानी भागात काम करणाऱ्यांसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना कराव्यात, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.