16 मार्च रोजी राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक.
महाराष्ट्रातील 7 जागांवर निवडणूक होणार.
उर्वरित नावांवर कोअर कमिटी बैठकीत अंतिम निर्णय.
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. यासाठी भाजपकडून राज्यसभेचे आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलीय. या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. उमेदवारांची नावे जाहीर केले जातील.
हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाण्याची शक्यता आहे. यापैकी एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव निश्चित झालंय. तर इतर तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपच्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या तीन उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. यात विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा अधिक होत आहेत.
विनोद तावडे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपसाठी संघटनात्मक पातळीवर मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन भाजप त्यांना राज्यसभेवर संधी देणार का? असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जातोय. तसे घडल्यास विनोद तावडे हे सक्रिय राजकारणात पुनरागमन करतील. यामुळे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत असेल. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातील 7 जागांपैकी सहा जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.