राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. आज कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या नागपूर आणि वर्धामधील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून नदी-नाल्यांना पूर आल आहे. हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामान खात्याने केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. सरूळ इथली यशोदा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुलावरून ३ फुटांपर्यंत पाणी वाहत आहे. यशोदा नदीला पूर आल्याने अलमडोह ते अल्लीपूर मार्ग बंद झाला आहे. तर वर्धा ते राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हे दोन्ही मार्ग बंद झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा या नदीला पूर आला आहे. हिंगणघाट आणि देवळी तालुक्यातील गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. नदीकाठावरील गावाना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूराचे पाणी गावांमध्ये शिरण्याची शक्यता आहे.
वर्ध्यातील यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये सतत वाढ होत चालली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आजही वर्धामध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली. सतत सुरु असलेल्या पावसामुळे वर्धा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात नक्षी नदीला पूर आला आहे. त्यामुळे भिवापूर - जवळी - हिंगणघाट मार्ग बंद झाला आहे. गेले दोन दिवस नागपुरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक पाऊस भिवापूर तालुक्यात झाला. मात्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली नव्हती. पण काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नक्षी नदी ओसंडून वाहत असून नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी जवळपासच्या क्षेत्रामध्ये शिरले आहे. परिणामी भिवापूरवरून हिंगणघाटकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने आज रायगड, पुणे घाटमाथा, नाशिकचा घाटमाथा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.