दिल्ली, ता. २ जूलै २०२४
लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणूक, पेपर फुटी प्रकरण, राममंदिर, हिंदूत्व अन् काश्मिर- मणिपूरवरुन राहुल गांधींनी भाजपला धारेवर धरले. यावेळी राहुल गांधींनी हिंदुंचा अपमान केल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी लगावला. भाजपच्या या आरोपावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"भाजपच्या नकली हिंदुत्वाचा चेहरा राहुल गांधी यांनी उतरवला. उद्धव ठाकरे जे उत्तर देतात तेच राहुल गांधी यांनी दिलं. राहुल गांधी यांनी काल सांगितले भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही हिंदुत्वाचा ठेका घेतला नाही. मजबूत आणि प्रामणिक विरोधी पक्ष काय असतो हे देशाला दिसलं, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
"एक अकेला सब पे भारी असं कालचे चित्र होते. ९ मंत्री राहुल गांधी बोलत असताना उभे राहिले. त्यांना वारंवार उभे राहावे लागले. १० वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना ओम बिर्लांकडे संरक्षण मागावे लागले. कालपर्यंत आम्हाला संरक्षण मागावं लागत होतं, काल त्यांना संरक्षण मागावं लागलं. राहुल गांधी यांनी काल त्यांना गुडघ्यावर आणलं," अशी कोपरखळीही संजय राऊत यांनी मारली.
"देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून राज्यात असे सुरू आहे. त्यांच्या टोळ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावं लागेल. अंबादास दानवे यांनी कालपर्यंत सगळे शिष्टाचार पाळले होते. फडणवीस यांनी सगळे दलाल एकत्र गोळा केले आहेत," असे म्हणत काल राज्याच्या विधानसभेत झालेल्या गोंधळावरुनही संजय राऊत यांनी राज्यातील भाजपवर निशाणा साधला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.