राज ठाकरे यांनी ४ बड्या मनसे नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
कोकणातील वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांच्यावर कारवाई.
पक्षविरोधी कार्य आणि धोरणांचे उल्लंघन हा हकालपट्टीचा मुख्य कारण.
वैभव खेडेकर यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंबद्दल आपली निष्ठा कायम असल्याचे सांगितले.
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या सर्वांना पक्षातून काढून टाकण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह चौघांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर कोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी मनसे पक्षातून बडतर्फ केले आहे. मनसेकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसंच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे या सर्वांना बडतर्फ करण्यात आले असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अकाऊंटवरून ही माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.
वैभव खेडकर- (खेड, रत्नागिरी), अविनाश सौंदळकर- (राजापूर, रत्नागिरी), संतोष नलावडे- (चिपळून -रत्नागिरी), सुबोध जाधव (माणगाव- रायगड) या कोकणामधील नेत्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात मनसेमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच ही कारवाई करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगल्या आहेत.
वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेच्या महत्वाच्या आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक होते. मनसेची स्थापना झाल्यापासून ते राज ठाकरेंसोबत होते. पण गेल्या काही महिन्यांपासून वैभव खेडेकर मनसेची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी दापोलीमध्ये झालेल्या महायुतीच्या कार्यक्रमात ते दिसले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर त्यांना शिंदे गटाकडून देखील ऑफर देण्यात आली होती. मनसेतून हकालपट्टी केल्यानंतर आता ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेत खंत व्यक्त केली. 'बडतर्फ केल्याचे पत्र वाचून खूप दु:ख झाले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे. राजसाहेब आपण फार घाई केली. तुम्ही कालही मनात होता, आजही आहात आणि उद्याही राहाल. ३० वर्षे पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो. आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक लागला. हे पत्र पाहून मला धक्का बसला. मला कधीही अपेक्षित नव्हतं. मी अजून निर्णय घेतला नाही. पण आता मला पुढील निर्णय घ्यावा लागेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.