Summary:
अहिल्यानगरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ
कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा शरद पवार गटाला मास्टरस्ट्रोक
शरद पवार गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला
हा पक्षप्रवेश मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला
अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. याठिकाणी भाजपने रोहित पवार यांना मोठा धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. अहिल्यानगरचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्यासोबत माजी नगरसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतले. आगामी नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या तोंडावर रोहित पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेड तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद पवार गटाचे दत्तात्रय वारे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कर्जत जामखेड येथील शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी, सरपंच, माजी सरपंच, बाजार समिती संचालक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपचे कमळ हाती घेतले. कराड- उत्तर येथील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
अहिल्यानगर जिल्ह्यातून भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये मुंबईचे माजी सहाय्यक आयुक्त राजेंद्र पवार, कर्जतचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, कवडगावचे माजी सरपंच सखाराम भोरे, जामखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब रिटे, कवडगावचे सरपंच सीताराम कांबळे, सुंदरदास बिरंगळ यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर कराड- उत्तर तालुक्यातील यशवंतराव चव्हाण पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष गोरे, नरेंद्र साळुंखे, माजी सरपंच जनार्दन साळुंखे, आदर्श शेतकरी प्रवीण साळुंखे, उद्योजक प्रशांत जाधव, माजी सरपंच तानाजी पाटील, जालिंदर लामजे यांच्यासह अनेकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, 'पीएम नरेंद्र मोदी यांची विकासाची दृष्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात विकासाची नवी उंची गाठली जात आहे. देश सशक्त बनवण्यासाठी सशक्त भाजपा होणे गरजेचे आहे. देशाला बलशाली बनवण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ज्या विश्वासाने या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.