ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आंबेडकर बंधूंबाबतही चर्चा जोरात.
आनंदराज आंबेडकरांनी वेळ आली तर आम्हीही एकत्र येऊ ,असं आनंदराज आंबेडकर म्हणालेत.
दलित राजकारण आणि आघाडी समीकरणांवर मोठा परिणाम होणार आहे.
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना देखील पाहायला मिळत आहे. तसेच दोन्ही पवार एकत्र येण्याची देखील जोरदार चर्चा आहे. अशातच दोन्ही आंबेडकर बंधू कधी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.
याबाबत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले, की प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ ठरवून येत असते. आत्ता उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात काळाची गरज आहे म्हणून ते एकत्र आले आहेत. आमच्यात देखील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि काळ आणि वेळ आला की आम्ही देखील एकत्र येऊ, असं यावेळी आंबेडकर म्हणाले.
आंबेडकरी चळवळीच्या एकत्र येण्याबाबत चर्चा होत असते. याबाबत आनंदराज आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की आंबेडकरी चळवळीच्या ऐक्याचा विषय हा अत्यंत जुना झालं असून लोकांच्या मनातून हा विषय आता बाद झाला आहे. बरेच गट हे देखील नामशेष झाले आहेत.आता रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं, अस आंबेडकरी जनतेला देखील वाटत नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
मागील महिन्यात रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याबाबत आत पुढे केला होता. रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहेत. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही, ठाकरे बंधूप्रमाणेच आमच्याही भेटी वाढल्या पाहिजेत, असं आठवले यांनी म्हटलं आहे, परंतु आता शिवसेनेमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात. राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात, पण जर असं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे.
मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगितलं आहे, प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं. मला वाटतं जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत आहेत, तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत युती असून जागांबाबत काही चर्चा झाली का याबाबत आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले, आंबेडकरी जनतेला नगरसेवक व्हावं,
या उद्देशाने आम्ही त्यांच्याशी युती केली असून १० टक्के जागा वाटपाबाबत आमची एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच आम्ही त्यांना जिथे जिथे आमची ताकत आहे. तिथे-तिथे आम्हाला आमचा उमेदवार देण्यात यावा असं देखील सांगितलं असून आम्ही आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवणार आहोत.
दरम्यान,रिपब्लिकन ऐक्याचे महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनच अनेकदा प्रयत्न झाले, हे ऐक्य झालंही पण ते जास्तकाळ काही टिकू शकलं नाही. आता सध्याच्या घडीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षच काही प्रमाणात आपला प्रभाव टिकवून आहे. इतर गटांची तर चर्चाही कधी ऐकायला मिळत नाही. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी आता वंचित या नावानं आंबेडकरी राजकारणाला वेगळं रुप देण्याचा प्रयत्न केला आहे.
पण तरीही त्यांचा पक्ष आणि चळवळ ही प्रामुख्यानं घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनीच सुरु असल्यानं रिपब्लिकन पक्षांमध्ये आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचाही विचार केला जातो. नुकतेच आठवलेंनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना ऐक्यासाठी साद घालण्याचा प्रयत्न केला. ऐक्यानंतर पक्षाची संपूर्ण धुरा तुम्ही सांभाळा, अशी भूमिकाही घेतली. पण आठवलेंना आंबेडकर जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.
अद्यापही त्यांचा आठवलेंना कडवा विरोध कायम आहे. रामदास आठवलेंनी ऐक्यासाठी सात घातल्यानंतर आता आनंदराज आंबेडकरांनी ही प्रकाश आंबेडकरांकडे एक हात पुढे केला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच रिपब्लिकन ऐक्य होऊ शकतं यासाठी आता प्रकाश आंबेडकरांनी हात पुढे करणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.