माझ्या समाजाच्या लोकांना हे लोक मोठं होऊ देत नाहीत... मी पुन्हा तुम्हाला दिसेन की नाही माहिती नाही, पण ही आपली शेवटची लढाई आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटीतील बैठकीत अत्यंत भावूक झाले. हे बोलताना जरांगेंचे डोळे पाणावले आणि कंठ दाटून आला. या भावनिक आवाहनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका केली.
मुंबईतील आंदोलनात महिलांच्या (माय-माऊलींच्या) सहभागाबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, या लढ्यात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आम्ही आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहोत. त्यामुळे तुम्ही महिलांनी थेट अमृताताई फडणवीस आणि लताताई शिंदे यांच्या घरी जाऊन शांततेच्या मार्गाने हळदीकुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. हळदीकुंकू लावतानाच त्यांच्याकडे 'मराठ्यांना आरक्षण द्या' अशी मागणी करायची आहे.
सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेचा संदर्भ देत जरांगे पुढे म्हणाले, लाडक्या बहिणींचा एक भाऊ देवेंद्र फडणवीस आहेत, तर दुसरा भाऊ एकनाथ शिंदे आहेत. शिंदे साहेबांची तुम्ही 'लाडकी बहीण' आणि फडणवीस साहेबांची 'लाडकी दीदी' आहात. आता या लाडक्या बहिणी भावांना भेटायला येत आहेत, तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्वागतासाठी स्वतःच्या दारात मोठा मंडप टाकावा आणि जेवणाची व्यवस्था करावी.
आझाद मैदानावरील सोयीसुविधांवर बोट ठेवत जरांगे टोलेबाजीत म्हणाले, आम्हाला आझाद मैदानात कोणताही आयता मंडप नाही, पण तुमचे हे दोन भाऊ तुम्हाला मात्र नक्कीच मंडप टाकून देतील. ५ रुपयांचा वडापाव द्यायचा म्हटला तरी २५ लाख महिलांना रोज जेवू घालायला दरदिवशी १५ एकराचं वावर लागेल! पण तुमचे भाऊ श्रीमंत आहेत, ते नक्कीच ही सोय करतील. आरक्षणाच्या लढाईत समाज पाठीशी उभा राहत असताना, दुसरीकडे नेत्यांकडून होत असलेल्या अडवणुकीचा पाढा वाचताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले. ही आपली आरपारची अन् शेवटचीच लढाई आहे, असे सांगत त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरण्याचे आवाहन केले
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्यव्यापी निर्णायक बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. 15 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या बैठकीला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महिला भगिनी मुंबईची घोषणा होताच चांगल्याच आक्रमक झाल्या असून आता आम्ही महिला माघारी हटणार नाहीत. दोन वेळेस आमचे पुरुष बांधव गेले. मात्र, आता आम्ही मुंबई गाठणार आहोत. या बहिणी आता सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत. मनोज जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सगळा महाराष्ट्र जाम करू त्याचबरोबर आमदार, खासदार मंत्र्यांच्या गाड्या आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत असा इशारा जरांगे पाटील यांच्या बैठकीला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महिलांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.