Sambhaji Bhide Meets Manoj Jarange: मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे जालन्यातील अंतरवाली गावात गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे सरकारकडून जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. आज राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालन्यात पोहचलं आहे. (Latest Marathi News)
या शिष्टमंडळात मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह संभाजी भिडे देखील आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी आम्ही मराठा आरक्षणाचा समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहे, तुम्ही मागे वळून पाहायचं नाही. जसे पाहिजे तसे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला.
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लबाड नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या अंगी लुच्चेपणा नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असतील, तरी कायदेशीर माणूस आहेत, माझं असं मत आहे की, तुम्ही उपोषण थांबवावं, अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे.
त्याचबरोबर राजकारणी जो शब्द देतील, तो शब्द पाळून घ्याचं काम माझं आहे, मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळेल, असा विश्वासही संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. आपल्या तब्येतीला सांभाळा. उपोषण मागे घ्या, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्यापाठोपाठ संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनीही यांनी मनोज जरांगे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मी थोड्या वेळात माध्यमांशी बोलेन. तेव्हा माझी भूमिका स्पष्ट करतो, असं जरांगे म्हणाले. त्यामुळे आता ते नेमकी काय भूमिका घेणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.