संजय महाजन, साम टीव्ही
जळगाव-भुसावळ महामार्गावरील नशिराबाद टोल प्लाझावर शनिवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या मार्गावरील टोल प्लाझाच्या छतावरील पत्रे आणि लोखंडी अँगल वाऱ्याच्या वेगाने उडून थेट जमिनीवर कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेच्या वेळी टोल प्लाझावर पाच ते सहा कर्मचारी नियमित कामकाज करत होते. अचानक मोठा आवाज होत पत्रे आणि अँगल कोसळू लागल्याने कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. विशेष म्हणजे, ज्या क्षणी पत्रे कोसळली त्यावेळी संबंधित लेनमध्ये कोणतेही वाहन नसल्याने वाहनचालकांची देखील जीवितहानी टळली. अन्यथा ही घटना गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता होती.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे टोल प्लाझावरील दोन लेनचे छत पूर्णपणे नुकसानग्रस्त झाले असून त्या दोन्ही लेनमधील टोल वसुली तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच परिसरातील काही झाडेदेखील उन्मळून पडल्याने टोल परिसरात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर टोल प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भाग सुरक्षित करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ टोल प्लाझावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने नशिराबाद टोल प्लाझावरील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.