जळगाव : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान होत असताना रात्रीच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील काही भागाला देखील पावसाने झोडपून काढले आहे. यात जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा व चाळीसगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे बहुतांश भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. काही भागातील घरांसह दुकाने व गुदामात पाणी शिरले आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. यामध्ये प्रचंड नुकसान झाले असून अनेकांचे शेतातील पिके वाहून गेली असून काहींचा संसार उध्वस्त झाला आहे. तर यानंतर रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. यात तीन तालुक्यात झालेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
अनेक ठिकाणी मोठे नुकसान
मुसळधार पावसामुळे मुख्य बाजारपेठेत अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांसह कार्यालयांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. येथील शेतकरी संघाच्या खतांच्या गोडावूनमध्ये पाणी शिरून रासायनिक खतांच्या सुमारे १ हजार ४०० गोण्या भिजल्या आहेत. यात युरिया, डीएपी, सुपर फॉस्फेट, पोटॅश सल्फेट आदींचे सुमारे १४ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यवस्थापक सुरेश पाटील यांनी व्यक्त केला.
नुकसान भरपाईची मागणी
दरम्यान पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी संघाकडून केली जात असून भडगाव तालुका फळ विक्री सोसायटीच्या देखील जवळपास २ हजार ४०० विविध रासायनिक खतांच्या गोण्या पाण्यात सापडल्याने सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज सोसायटीचे व्यवस्थापक वाल्मिक पाटील यांनी व्यक्त केला. शिवाय शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.