हिंगोलीत कागदोपत्री विहीर बांधल्याचा आरोप
शेतकरी रामचंद्र खडसे यांनी विहीर चोरीला गेल्याची तक्रार
रोजगार हमी योजनेअंतर्गत लाखो रुपयांचे अनुदान उचलल्याचा आरोप
हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चक्क एका शेतकऱ्याची विहीर कागदोपत्री तयार झाली. हिंगोलीतील सेनगाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या धनगरवाडी गावच्या शिवारात धक्कादायक प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकारानंतर शेतकरी रामचंद्र खडसे यांनी आपल्या शेतात परस्पर विहीर झाल्याचा दावा करत विहीर चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विहीर, गोठे आणि वेगवेगळ्या योजनेतून रस्ते देण्यात येत आहेत. मात्र यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी स्थानिक एजंटला धरून मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्षात विहीर नाही, तरी कागदोपत्री मात्र लाखो रुपयाचे अनुदान उचलल्याचे निष्पन्न झाल्याने कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या अधिकारावर डल्ला कोण मारतोय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
विहीर चोरीला गेल्याच्या शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी शिवसैनिकांना सोबत घेत थेट शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर चोरीला गेलेल्या विहिरीची तातडीने शोध मोहीम सुरू करावी, अशी मागणी केली आहे. शेतातील चोरीला गेलेली विहीर शोधून द्या आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी शेतकरी रामचंद्र खडसे यांनी केली आहे
तत्पूर्वी, या सर्व गंभीर प्रकारानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड यांनी या प्रकरणात तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतरच या प्रकरणात नेमकं काय घडलं याची सत्यता बाहेर येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.