राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा चिंतेत आला असून त्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. एका रात्रीत शेतात उभं असलेले पीक आडवं झाले आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आंबा, द्राक्ष, सफरचंद, पपई या सर्व फळबागांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत लिंबू, कांदा, मका या पिकांचे देखील मोठं नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पपईची बाग उद्ध्वस्त झाली. सेलू तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकरी राजेंद्र लटारे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दीड एकरमध्ये त्यांनी पपईची लागवड केली होती. झाड परिपक्व झाल्यानंतर ऐन तोडणी सुरू करण्याच्या वेळेवर वादळमुळे त्यांची पपईची बाग जमीनदोस्त झाली. वादळामुळे पपईची झाड तुटून पडल्यानं लाखो रुपयांचे नुकसान झाले. दीड एकरातील पपईची हजारांपेक्षा जास्त झाडं फळांसह तुटून पडली. नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे.
नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. गंगापूर गावातील ६ घरांचे प्रचंड नुकसान झाले. वादळात घर कोसळल्यानंतर वृद्ध महिलेला अश्रू अनावर झाले. घरांचे पत्रे उडाले, भिंत कोसळली संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. परिवारातील सदस्य मजुरीसाठी गुजरात राज्यात गेले असल्यामुळे घरी वृद्ध आजी आजोबा एकटे असताना ही घटना घडली. वादळी वाऱ्यात थोडक्यात या दोघांचा जीव वाचला.
बुलडण्यात सकाळपासून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली. शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे पुन्हा नुकसान झाले आहे. रात्री सुद्धा जिल्ह्यातील बुलडाणा, मोताळा, नांदुरा शेगाव सह इतर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील शेंबा परिसरात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामुळे मका पीक भुईसपाट झाले. या ठिकाणी २० तासांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे.
रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील नांदुरा आणि मोताळा तालुक्यातील शेंबा, टाकरखेड, खैरा, वडनेर, या गावांत अवकाळी पाऊस आणि वादळाचा मोठा फटका बसला. शेतातील उभी पिकं जमीनदोस्त झाले आहेत. मका पिक पूर्णपणे झोपली आहेत. निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहेत. मका, कांद्याचे बी आणि केळी बागेचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलांणच्या मोसम खोऱ्यात संध्याकाळच्या सुमार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने कांदा, डाळिंब सह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हलक्या स्वरूपाच्या गारपिटीमुळे कांदा पात तुटून पडली त्यामुळे कांद्याचे नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कांद्याला मोठा फटका बसला. कांद्याच्या शेतामध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती झाली. अवकाळी पावसामुळे कांदा पात करपायला सुरुवात झाली. गारपिटीमुळे कांद्याच्या मुळाशी पाणी साचल्यानं कांद्याची मुळं देखील सडण्याची शक्यता आहेत.
तर दुसरीकडे अवकाळी आणि गारपिटीमुळे नाशिकमध्ये द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले. गारपिटीमुळे उभ्या द्राक्ष बागेतले द्राक्षमणी तडकले. अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि घड गळून पडलेत. द्राक्ष बागांना गारपिटीचा फटका बसल्याने व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबवली आहे. अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सध्या बाजारात द्राक्षाला ६५ ते ७० रुपये भाव मिळत होता. मात्र अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळल्याने भावावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नागपुरात मागील ३ दिवसांपासून अवकाळी पावसाह गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून दिला आहे. असे असताना सुद्धा हवामान विभागाच्या इशाऱ्या नंतरही कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर यांनी कुठलीही खबरदारी न घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात उघड्यावर असलेलं शेतकऱ्यांचे धान्य पावसामुळे भिजले आहे. काही प्रमाणात हे धान्याचे पोते झाकून ठेवल्यामुळे नुकसान कमी झालं. मात्र जे उघड्यावर ठवलेले धान्याचे पोते होते ते भिजले आहे. यात काल रात्री आणि आज सकाळी झालेला पाऊस हा अगदी तुरळक होता. मात्र मुसळधार पावसाचा इशारा नंतरही यावर कुठली खबरदारी घेतली गेली नाही. तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. कांदा, संत्रा, लिंबू,आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पश्चिम विदर्भात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. बुधवारी सायंकाळी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर- खंदरमाळ परीसर आणि अकोले तालुक्यात अनेक गावात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातोंडाशी आलेला कांदा, गहू भुईसपाट झाला तर वाटाणा, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले आहे..
नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगापूर, ठाणेपाडा या परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या मोठे नुकसान झाले आहे. गंगापूर, ठाणेपाडा परिसरातील जवळपास २०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. ऐन हातातोंडांशी आलेला घास निसर्ग राजाने हिरावला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, मका, गहू लसूण या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे झालं आहे. पिकांसोबतच जनावरांना लागणारा चारा देखील खराब होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यामुळे ठाणेपाडा, गंगापूर परिसरातील अनेक घरांची पडझड झाली आहे. शासनाने तात्काळ शेतीच्या बांधावर येऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी शेतकऱ्यांनी केली आहे.
अकोल्यातल्या तेल्हारा आणि अकोट तालुक्यातल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अकोट तालुक्यातल्या ऐदलापूर शेत शिवारात सफरचंद बागेला मोठा फटका बसला. नवनीत चांडक यांच्या सफरचंद बागेला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अक्षरशः झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडले आहेत. दरम्यान तेल्हारा तालुक्यातल्या हिंगणी, दानापूर, तळेगाव बाजारसह आदी गावांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.