
राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, मार्च महिन्यात एकूण २७ उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती महिला, स्तनदा माता, जास्त शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती आणि सहव्याधीग्रस्त रुग्ण यांच्यावर उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम होतो. पुण्यात देखील उष्णतेत वाढ झाली आहे.
पुण्यात उष्णतेची तीव्रता वाढत असून, लोहेगाव येथे कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शिवाजीनगरमध्ये ३० मार्चला ३९ अंश आणि ३१ मार्चला ३९.२ अंश सेल्सिअस तापमान झाले. शिवाजीनगरचे सरासरी कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सिअस होते, जे मार्चच्या सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक नोंदले गेले.
फेब्रुवारीमध्ये तापमानात मोठ्या चढउतारांची नोंद झाली, मात्र मार्चमध्ये उष्णता सातत्याने कायम राहिली. संपूर्ण महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी, तर किमान तापमान १.५ अंशांनी जास्त होते. शिवाजीनगरमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले नसल्याने अधिकृत उष्णतेची लाट जाहीर झाली नाही. IMDच्या अंदाजानुसार, एप्रिलमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. मात्र, पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार असून, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. गर्भवती महिलांनी शक्यतो उन्हात जाणे टाळावे आणि हलका, पोषणयुक्त आहार घ्यावा. शारीरिक श्रम करणाऱ्या नागरिकांनी दीर्घकाळ उन्हात राहण्याऐवजी मधूनमधून सावलीत विश्रांती घ्यावी.
शरीरातून अधिक प्रमाणात घाम गेल्यास ओआरएस, साखर-मीठ पाणी किंवा ताकाचे सेवन करावे, जेणेकरून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतील. उष्णतेच्या लाटेमुळे आधीच आजारी असलेल्या व्यक्तींना अधिक त्रास जाणवू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.