६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे झोपेतच निधन झाले
त्यांच्या जाण्याने सामाजिक न्यायाच्या लढ्याला धक्का बसला
निधनापूर्वी त्यांनी ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’चे लेखन पूर्ण केले
आजारी असूनही त्यांनी समाजकार्य थांबवले नाही
भारतातील पददलितांसाठी ६ डिसेंबर १९५६ हा दिवस काळा दिवस ठरला. या दिवशी पददलितांची सकाळ सूर्योदयानं नाही, तर सूर्यास्तानं उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार आणि हक्काचा आवाज असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता. या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी अशा असाध्य आजारांनी ते त्रस्त होते. मधुमेहाने त्यांचं शरीर पोखरून जर्जर झाले होते. संधिवाताच्या त्रासामुळे अनेक रात्र त्यांना त्रासातून काढाव्या लागल्या. पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला.
१२ नोव्हेंबर १९५६ साली बाबासाहेब काठमांडूला गेले. तिकडचे सगळे कार्यक्रम आटपून आणि भेटीगाठी पूर्ण करून ३० नोव्हेंबर रोजी भारतात राहत्या घरी परतले. या बऱ्याच दिवसांच्या भ्रमंतीनंतर बाबासाहेबांची प्रकृती नाजूक झाली होती. आधीच आजाराने त्रासलेले बाबासाहेबांचे शरीर या भ्रमंतीनंतर काहीसे थकलेले होते. आजारी असल्यानं महाराष्ट्रात सुरु असलेल्या राज्यसभेच्या अधिवेशनाला देखील त्यांना जात आले नाही. तरीही ४ डिसेंबर रोजी त्यांनी राज्यसभेला जाण्याचा हट्ट धरला. बाबासाहेबांची संसदेतली ही शेवटची भेट ठरली.
राज्यसभेतून परतल्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन नेहमीप्रमाणे माईसाहेबांसोबत गप्पा मारून १४ डिसेंबर रोजीच्या नागपूर शहराच्या धर्मांतराचं नियोजन करत होते. तब्बेतीची दखल घेत त्यांनी या कार्यक्रमाला विमानाने जाण्याचे ठरवले. या सगळ्या नियोजनांतर ते झोपी गेले. ५ डिसेंबरच्या सकाळी त्यांनी सकाळची दिनचर्या आटपून माईसाहेब आणि डॉ. मालवणकर यांच्यासोबत एकत्रित न्याहारी केली आणि नंतर बंगल्याच्या व्हरांड्यात गप्पा मारत बसले. यादरम्यान बाबासाहेबांनी वर्तमानपत्रं वाचली.
या दिवशी दुपारच्या सुमारास ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनालेखनाचं काम ते पूर्ण करत होते. बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या. जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपले. त्यांनतर दिल्लीतील घरासाठी खरेदी करण्यासाठी गेल्या त्यांच्यासोबत डॉ मालवणकर देखील गेले आणि खरेदी करून संध्याकाळी ५ च्या सुमारास परत आले.
६ डिसेंबरला जैन समाजाचे संमेलन भरणार होते. यासंदर्भात ५ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बाबासाहेबांसोबत पूर्वनियोजित भेट होती. ही भेट घेऊन बाबासाहेब ‘बुद्धमं सरणं गच्छमि’ या बुद्धवंदनेच्या ओळी शांतपणे म्हणू लागले. आनंद मन:स्थितीत असताना बाबासाहेब बुद्धवंदना आणि कबिराचे दोहे म्हणत असत.
त्या रात्री सगळी काम आटपून जेवण करून ते शयनगृहाकडे वळले आणि एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रेंना, तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडेअकराच्या सुमारास ते झोपी गेले. ६ डिसेंबर १९५६ ला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेल्या. सकाळचे सात-साडेसात वाजले होते.माईसाहेबांना वाटलं ते गाढ झोपेत आहेत म्हणून त्यांनी त्यांना थोडं पुढे जाऊन हाताने हलवलं पण ते झोपेतच परिनिर्वाण झाले होते. त्यांच्या जाण्याने देशातील पददलितांना मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.