मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना छत्रपती संभाजीनगरमधील दोघांनी फोनवरून धमकी दिली. याआधी मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलन सुरू होते, त्यावेळेस मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आणि आता तुम्ही भेटायला कशाला येत आहात? असा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही जर इथे भेटायला आले तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू अशी धमकी प्रसाद लाड यांना दिली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. गणेश उगले पाटील, योगेश शितोळे पाटील अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना सिडको परिसरातून अटक केली.
प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवली -
धमकीनंतर प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कडक बंदोबस्तात प्रसाद लाड अंतरवाली सराटीकडे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. गाडीच्या पुढे तीन पोलिसांच्या गाड्या आणि गाडीच्या मागे तीन अशा सहा पोलिसांच्या गाड्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सोबत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेल रामा पासून ते चिकलठाणा पर्यंत रस्ता सर्वसामान्यांसाठी रस्ता रोखून ठेवला आहे.
"मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असून हे सरकारचे अधिकृत शिष्टमंडळ नाही, तर मी वैयक्तिक पातळीवर ही भेट घेत आहे. आजच्या या बैठकीत मी मनोज जरांगे यांच्याकडून त्यांच्या मागण्यांचे नेमके मुद्दे समजून घेणार आहे. त्याचसोबत सरकारने आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी काय काय सकारात्मक पावले उचलली आहेत, हे देखील मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. आमच्या दोघांमध्ये जे काही बोलणे होईल, ती सर्व चर्चा मी सरकारपर्यंत पोहोचवेन आणि त्यानंतर नक्कीच या प्रकरणावर काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल," असा विश्वास भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला आलेल्या धमकीच्या फोनचाही खुलासा केला. लाड म्हणाले, मला काल रात्री फोनवरून धमकी आणि अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागातून दोघांना अटक केली आहे. गणेश उगले पाटील आणि योगेश शितोळे पाटील अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तुम्ही पूर्वी मराठा आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केले होते, मग आता चर्चेला कशाला येत आहात?' असे म्हणत त्यांनी मला हॉटेलमध्ये घुसून मारण्याची धमकी दिली. मात्र, त्या मराठा बांधवांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर जास्त कडक कारवाई करू नये अशी विनंती मी करेन, असे ते म्हणाले.
मराठा बांधव म्हणून मी अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २३ तारखेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते, आज २२ तारीख आहे आणि मी इथे आलो आहे. मी त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलो असून, हे प्रश्न समिती आणि सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना जे जमले नाही ते फडणवीसांनी करून दाखवले, असे लाड म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाचे सर्वांनी गुणगान केले पाहिजे. त्यांच्यावरील कोणतीही टीका खपवून घेतली जाणार नाही. जरांगे पाटील यांनी मला 'भाऊ' मानले आहे; त्यामुळे कदाचित ते आपल्या या भावाचे ऐकतील, अशी आशा आहे. उदय सामंत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांचे जरांगे पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांच्यामुळे हे आंदोलन सुरू आहे, असा माझा अजिबात आरोप नाही. ते महायुतीचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे कोणीही महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये; अशा चर्चा करणाऱ्यांना आम्ही महत्त्व देत नाही., असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.