कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये होणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारलीय. यावरून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. मराठी भाषकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकरण्यात आल्याने सीमावासियांकडून संताप व्यक्त केला जातोय. या प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केंद्रावर टीका केलीय. महायुती सरकारला आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. तसेच बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार, असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय.
कर्नाटकातील वादावरून कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आलीय. महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आले आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत उमटलेत. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी सभागृहाती दिवसभरातील कामकाजावर बहिष्कार टाकला. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांनी सीमा भागात जाण्याचा निर्णय घेतलीय. त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांना कोपरखळी मारलीय. सामंत आधी मंत्री होतील का नाही ते माहिती नाही असा टोला त्यांनी लगावला. बेळगावमधील लोकांना अन्याय का सहन करावा लागत आहे, ते लोक हिंदू नाहीत का? येथे महाराष्ट्रात आल्यानंतर भाजपचे मंत्री कटेंगे तो बटेंगे असा नारा देता. पण कर्नाटकात निर्माण होत असलेल्या वादावर काहीच का करत नाहीत असा सवाल ही आदित्य ठाकरेंनी केलाय.
बेळगावमधील मराठी माणसावर होणारा अन्याय, अत्याचार आणि अपमान आम्ही सहन करू शकत नाही. केंद्र सरकारने बेळगाव परिसरात जास्त निधी देऊन विकास करण्याचे आश्वासन दिलं होतं. बेळगावला केंद्रशासित प्रदेश कधी करणार? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकार कुणाचेही असले तरी अन्याय सहन करणार नाही, अशी ठाम भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली.
बेळगाव कारवारला केंद्रशासित प्रदेश करावा अशा प्रकारचा ठराव आजच आणावा अशी मागणी केली. मात्र आज नाही तर मग हिवाळी अधिवेशनात हा ठराव आणावा आम्ही एकमताने पाठिंबा देऊ ,असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
न्यायालयात बेळगाव प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तो परिसर केंद्रशासित करावा ही आमची कायम भूमिका असल्याचंही ते म्हणाले. आता सरकारने मराठी माणूस लाडका आहे की, नाही हे दाखवून द्यावे. मराठी माणसावरील अन्याय दूर करण्याबाबत सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.
विधीमंडळात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. सभागृहामध्ये प्रथेप्रमाणे आपला परिचय झालेला आहे. त्याबद्दल सर्व सदस्यांनी आपले अभिनंदन ही केलेले आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होतोय. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे.
बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याव द्यावा. सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगांव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा आम्ही एक मताने या ठरावास पाठिंबा देऊ. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.