योगेश काशीद
बीड : राज्यामध्ये सर्व दूर पावसाने हाहाकार माजवला आहे. याचा फटका बीड जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. बीड जिल्ह्यामध्ये १७ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तीन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये सोयाबीनसह कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून बीड जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यात अकरा तालुक्यामध्ये अधिक पाऊस झाला असून अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून पिके देखील पाण्याखाली गेले आहेत. याचा परिणाम आता उत्पादनावर होणार आहे.
तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
दरम्यान नुकसानी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित महसूल मंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने साम टीव्हीशी बोलताना दिली आहे. या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासोबतही या संदर्भात माहिती विचारून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत; अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
सोयाबीनचे नुकसान
अमरावती जिल्ह्यात संततधार पावसामुळे सोयाबीन पिके सडायला लागली आहेत. तर तिवसा तालुक्यासह अनेक भागात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. येलो मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे पिके पिवळी पडली आहेत. तर दुसरीकडे जमिनीत क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने पिके सडली असल्याने हजारो हेक्टर वरील सोयाबीन खराब झाले आहे. तर सततच्या पावसामुळे सोयाबीनसह कपाशी, उडीद, मूग पिकालाही मोठा फटका बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.