मयूरेश कडव
बदलापूर : उल्हास नदी पात्रात अवैधरित्या भराव टाकण्यात आला आहे. हा भराव टाकल्याप्रकरणी बदलापुरातील धार्मिक संस्था असलेल्या सत्संग विहारला महसूल विभागाने चांगलाच दणका दिला आहे. सत्संग विहारवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून याच प्रकरणात अंबरनाथ तहसील कार्यालयाने तब्बल १० कोटी १६ लाखांचा दंड ठोठावला आहे.
बदलापुरातील हेंद्रे पाड्यात सत्संग विहार ही धार्मिक संस्था आहे. अलीकडेच सत्संग विहार मार्फत उल्हास नदी पात्रात अवैधरित्या ८ हजार ९१२ ब्रास माती, १९६ ब्रास दगड आणि ८३ ब्रास दगड पावडर हे गौणखनिज टाकून भराव करण्यात आला होता. यामुळे नदीच्या पाणी प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवत तक्रार केली आहे.
१० कोटी १६ लाखांचा दंड
या तक्रारीची दखल घेत अंबरनाथ तहसील कार्यालयाने सत्संग विहारला १० कोटी १६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच नदीपात्रातील भराव स्वखर्चाने काढून टाकण्याचे आदेशही दिले होते. मात्र सत्संग विहारने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तहसीलदार अमित पुरी यांनी संबंधित सत्संग विहार संस्थेवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
अखेर गुन्हा दाखल
त्यानुसार बदलापूरच्या मंडल अधिकाऱ्यांनी बदलापूर पोलिसांत एफआयआर दाखल केला असून सत्संग विहार संस्थेवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 48 (7), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51 (बी), आणि भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे सत्संग विहारच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.