आशिया कप 2025 मधील भारत-पाक सामना खेळू नये, ठाकरे गटाचे आंदोलन
'सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना काळं फासणार' – शिवसेना आमदाराचा इशारा
राज्यभर 'माझं कुंकू-माझा देश' आंदोलन, मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त
Asia Cup 2025 : मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यामुळे राज्यात आणि देशात राजकारण तापले आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने हा सामना खेळू नये, टीम इंडियाने या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. या सामन्याच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून 'माझं कुंकू-माझा देश' हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर 'आजचा हा सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना शिवसैनिक आणि जनता काळे फासणार' असल्याचे वादग्रस्त विधान ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांनी केले आहे. माझा देश, माझं कुंकू या आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी कुंकू आणि बांगड्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवण्यात आली. आंदोलनादरम्यान देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई, पुणे यांसारख्या राज्यभरात ठिकठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून माझा देश, माझं कुंकू हे आंदोलन सुरु आहे. कोल्हापूर, नाशिक, नांदेड, जळगाव, भिवंडी, यवतमाळ अशा अनेक ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता-भगिनींचे अश्रु सुकले नसताना मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडण्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. यवतमाळमध्ये रक्तरंजित क्रिकेटचे पिच तयार करुन त्यावर टिव्ही, स्टॅम, बॅटवर पेट्रोल टाकून जाळण्यात आला.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या विरोधात कोल्हापुरातील महाद्वार रोडवर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी हातात सिंदूर आणि केकची पाकिटे घेऊन मोदी सरकार विरोधात, पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी आणलेला केक हा सामान्य नागरिकांना वाटण्यात देखील आला. जर हा सामना हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार कुठेही दाखवण्यात आला, तर ती स्क्रीन फोडली जाईळ असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
जळगावमध्ये हातात सिंदूरच्या डब्या घेऊन कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला. पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सिंदूरची किंमत मोदी सरकारला कळणार नाही, त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही सिंदूरच्या डब्या पाठवत आहोत असे महिला आंदोलकांनी म्हटले. नांदेडमध्येही शिवसेना ठाकरे गटाकडून भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला विरोध केला जात आहे. नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत युद्ध पुकारणाऱ्या भारत सरकारने बीसीसीआयला आणि क्रिकेट संघाला पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाने आंदोलन पुकारले आहे. भिवंडी शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली. वेळी सर्व महिलांनी कुंकवाची डबी पेटीमध्ये एकत्रित करून आपला संताप व्यक्त केला आहे. ही कुंकवाची पेटी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवण्यासाठी रवाना केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.