मयुर राणे, मुंबई|ता. ७ मे २०२४
राज्यात आज ११ लोकसभा मतदार संघांमध्ये निवडणूक पार पडत आहे. यामध्ये अवघ्या देशाचं लक्ष लागलयं ते शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत असलेल्या बारामतीकडे. बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबात काँटे की टक्कर पाहायला मिळत असल्याने या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र बारामतीमध्ये पवारांना पाडण्याचा डाव यशस्वी होणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी- शहांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"बारामतीमध्ये सर्वांचे लक्ष आहे. काहीही करुन शरद पवारांचा पराभव करायचा, हे मोदी शहांनी ठरवले आहे. महाराष्ट्रातल्या एका स्वाभिमानी नेत्याचा, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्राचा जो आधारवड आहे. या शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबांचा पराभव करुन आम्ही व्यापारी, पैसा आणि तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला, हे दाखवायचे आहे. मात्र ते शक्य नाही. बारामतीमध्ये विक्रमी मताने सुप्रिया सुळे जिंकत आहेत," असा दावा संजय राऊत यांनी केला.
"महाराष्ट्राच्या अनेक मतदार संघात भाजप दारुण पराभवाच्या छायेत आहे. अनेक नेते संसदेत दिसणार नाहीत. नारायण राणेंच्या बाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल, लोकसभेच्या मैदानातही त्यांना चितपट केले जाईल, विनायक राऊत पुन्हा संसदेत जातील," असे म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणेंवरही निशाणा साधला.
"मुख्यमंत्री हा एक खोटारडा माणूस आहे. आपल्या स्वार्थासाठी जो माणूस आपल्या आईसारख्या शिवसेनेतच्या पाठीत खंजीर खूपसतो, त्याच्यावरती काय विश्वास ठेवायचा. हे डरपोक लोक आहेत एकनाथ शिंदे अजित पवार असतील त्यांची लोक एक नंबरचे डरपोक घाबरून पळाले लोक आहेत, " अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.