राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रचारानं जोर धरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये पहिली सभा देखील पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेत मात्र महायुतीच्या काही जागांचा पेच सुटताना दिसत नाही. विदर्भात 19 एप्रिलला मतदान आहे. निवडणूक तोंडावर आलेली असताना महायुतीतील जागावाटपाचं घोडं अडलंय.
नाशिक, ठाणे, सातारा, संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर वाद आहे. शिवसेना आपला दावा सोडायला तयार नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबावतंत्राचं राजकारण पहायला मिळतंय. दरम्यान ज्या जागांवर उमेदवार घोषित झालेले नाहीत त्या जागाची निवडणूक शेवटच्या टप्प्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यावर चर्चेतून मार्ग काढू, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असं एकमत झालं होतं. मात्र या जागेवरुन शिवसेना मागे हटायला तयार नाही. ठाणे आणि नाशिकसाठी मुख्यमंत्री शिंदे अटोकाट प्रयत्न करयायेत. महायुतीमध्ये एकमेकांबाबत दबाव तंत्राचा वापर केला जातोय. जर आश्वासन मिळून देखील नाशिकची जागा मिळत नसेल तर साता-यामधून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर करू अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. अशा वादामुळेच आणि बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार जाहीर केला जात नाही. दुसरीकडे मविआनं मात्र जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात सरशी घेतली आहे.
ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागांवर तोडगा निघू शकला नाही. ज्या जागांचा पेच कायम आहे त्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस त्या भागातील नेत्यांना बोलावून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रपक्षांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. जागांचा पेच सुटून महायुतीची गाडी प्रचारात आघाडी घेणार का? याची उत्सुकता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.