अनेक लोकांना सतत पाठदुखीचा त्रास होतो. या वेदना कमी करण्यासाठी ते डॉक्टरांचा सल्ला न घेता सहज मिळणारी पेनकिलर घेतात. अशा औषधांमुळे तात्पुरता आराम मिळतो पण वेदनेमागचं खऱ्या कारणाकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. तज्ज्ञांच्या मते, सततची पाठदुखी ही कधी कधी केवळ स्नायू किंवा मणक्यांची समस्या नसूनती किडनीच्या गंभीर आजाराची किंवा लपलेल्या किडनी ट्युमरचीही सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
डॉक्टर सांगतात की, पाठदुखीसोबत जर गडद रंगाची किंवा फेसाळ लघवी होत असेल, सतत थकवा जाणवत असेल, शरीरावर सूज येत असेल किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल दिसत असेल तर ही लक्षणं गंभीर असू शकतात. अशावेळी वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ही लक्षणं लपलेल्या किडनी ट्युमरची असू शकतात.
झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शिवम शिंगला सांगतात की, किडनीमध्ये असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ झाली की, किडनी ट्युमर तयार होतो. सुरुवातीच्या टप्प्यात हा ट्युमर कोणतीही स्पष्ट लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे तो अनेकदा इतर तपासण्यांदरम्यान अचानक सापडतो.
ते पुढे सांगतात की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ पेनकिलर घेणं किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. काही औषधं किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी करतात, ज्यामुळे किडनीला इजा होण्याचा धोका वाढतो. विशेषतः ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा आधीपासून किडनीचे आजार आहेत, त्यांच्यात हा धोका अधिक असतो.
अनेक रुग्ण पाठदुखीला फक्त स्नायू किंवा मणक्यांचा त्रास समजून दुर्लक्ष करतात. पण जर या वेदनेसोबत लघवीत रक्त येणं, फेसाळ लघवी, अचानक वजन कमी होणं, सतत थकवा जाणवणे किंवा पायांवर सूज येणं अशी लक्षणं दिसत असतील तर ती किडनी ट्युमरची शक्यता दर्शवू शकतात. अशावेळी त्वरित तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
डॉ. शिंगला सांगतात की, दर महिन्याला अशा अनेक रुग्णांचा अभ्यास केला जातो. ज्यात ४० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये सतत पाठदुखी, स्वतः औषधं घेण्याची सवय आणि फेसाळ लघवी ही लक्षणं दिसतात. अशा १० पैकी सुमारे ३ ते ४ रुग्णांमध्ये किडनीशी संबंधित समस्या आढळतात आणि काहींमध्ये किडनी ट्युमरचं निदान होतं. वेळेत उपचार न झाल्यास किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
किडनी ट्युमरचा उपचार त्याचा आकार, प्रकार आणि स्टेज यावर अवलंबून असतो. काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करून प्रभावित भाग किंवा संपूर्ण किडनी काढावी लागते. तसंच केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी यांसारखे उपचारही दिले जातात.
डोंबिवलीतील एआयएमएस रुग्णालयातील नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. सचिन गुप्ता सांगतात की, सध्या ४० ते ५० वयोगटातील अनेक रुग्ण सतत पाठदुखी, लघवीच्या रंगात बदल या तक्रारींसह येतात. हे रूग्ण वारंवार पेनकिलरही घेतात. तपासणी केल्यानंतर काहींमध्ये लपलेले किडनीचे ट्युमर आढळतात.
ते सांगतात की, अशा आजारांचे वेळेवर निदान झालं तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.