Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत स्ट्रीट लाईट बंद

Marathi Breaking Live Headlines Updates : विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज, ३ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, संसदेचे पावसाळी अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली असून या धरणाची पाणी पातळी 113.27cm वर पोहचली आहे. तर या धरणामध्ये 97% पाणीसाठा निर्माण झाला असल्याने धरणाचे पाच दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून धामणी धरणामधून 2700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये करण्यात आला आहे. तर धामणी धरणाच्या खाली असलेले कवडास धरण ओवर फ्लॉ असून धामणी आणि कवडास मिळून सध्या मोठा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे. तर पावसाचा अंदाज ही वर्तवण्यात येत आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई

वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर याने ७० हजार रुपये घेऊन बनावट कागदपत्रे दिल्याची तक्रार.

व्हॉट्सअॅपवर मूळ कागदपत्रांसारखी भासणारी इमेज पाठवल्याचा आरोप.

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ३ सदस्यीय संयुक्त चौकशी समितीची नियुक्ती

समितीत MPCB, CPCB आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असेल.

समितीला घटनास्थळाची पाहणी करून एका महिन्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

दुर्घटनेत पर्यावरणीय व सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी केली जाणार आहे.

गुरुपौर्णिमेचा खास दिवस! त्रिशुंड गणपती मंदिराचं बंद तळघर भाविकांसाठी खुलं

पुण्यातील सोमवार पेठेतील सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या श्री त्रिशुंड गणपती मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त वर्षातून केवळ एकदाच उघडण्यात येणाऱ्या तळघराच्या दर्शनासाठी आज भाविक मोठी गर्दी करतात. मंदिरातील हे तळघर वर्षभर बंद ठेवले जाते आणि केवळ गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भाविकांसाठी खुले केले जाते. यामुळे या ऐतिहासिक मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Pune : वाकड येथे नागरिकांचा भव्य आक्रोश मोर्चा 

 दोन सख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

वाकड येथे नागरिकांचा भव्य आक्रोश मोर्चा 

विद्यार्थ्यांवरील मारहाणीला अमित शहा जबाबदार - राहुल गांधी

Nanded : व्यापाऱ्यांनी केळीचे दर पाडले, केळी उत्पादक शेतकरी आक्रमक

नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीमुळे केळीचे दर अचानक कोसळल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. चार दिवसापूर्वी केळीला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. परंतु आज केळीला बाराशे ते तेराशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.व्यापाऱ्यांनी केळीचे दर अचानक पाडले असा आरोप केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

Pune: शरद पवारांसोबतची आजची भेट राजकीय भेट नव्हती - दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील -

आजची भेट राजकीय भेट नव्हती

रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात भेट होती

गुरुपौर्णिमा आहे आज पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले

राजकीय चर्चेबाबत मला काही बोलण्याचा अधिकार नाही

गुरु शिष्य हे नातं कायम असलं तरी चांगलं काम करा लोकांची सेवा करा असा गुरु मंत्र पवार साहेब नेहमीच देत आले आहेत

Nagpur: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

नागपूर -

- नागपूरच्या वैशाली नगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

- परिसरात एकच खळबळ उडाली.

- आगीमुळे धुराचे लोट आकाशात, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलं नियंत्रण

- अग्निशाम बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश....सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

Nalasopara: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

नालासोपारा -

नालासोपारा येथील कळंब परिसरातील तुळशी रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

भिवंडी येथील संदेश गुरव हा मित्रासोबत रिसॉर्टमध्ये आला होता.

मध्यरात्री सुमारे १ वाजता दारूच्या नशेत त्याने गावठी रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला.

Solapur: मंत्री भरत गोगावले यांची अक्कलकोटमध्ये क्रिकेटच्या टर्फवर फटकेबाजी

सोलापूर-

- मंत्री भरत गोगावले यांची अक्कलकोट मध्ये क्रिकेटच्या टर्फवर फटकेबाजी

- भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली गोलंदाजी

- अन्नछत्र मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट अकादमीचे उदघाटन मंत्री गोगावलेंच्या हस्ते करण्यात आले.

- यावेळी क्रिकेट मैदानात फलंदाजी करत मैदानाचे उदघाटन केले.

Pune:  दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली

दिलीप वळसे पाटलांचे शरद पवार आहेत गुरु

आज गुरुपौर्णिमा असल्याने वळसे पाटील यांनी भेट घेतली

कुमार सप्तर्षी यांच्या श्रद्धांजली सभेतही दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांचे पाय स्टेज वरती धरले होते

मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

५ जुलै २०२६ रोजी मृत्यू झाल्यानंतर दफन करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल 23दिवसांनी संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी बाहेर काढण्यात आहे

बी.कॉम.च्या कथित बनावट पदवी प्रकरणाविरोधात NSUI च्या आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बी.कॉम.च्या कथित बनावट पदवी प्रकरणाच्या निषेधार्थ नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तीव्र आंदोलन

Sangali : गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, वृक्ष संवर्धनाचा संदेश

सांगलीच्या जत तालुक्यातील संख येथे अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी झाली आहे.गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.

संख येथील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तुकाराम बाबा यांनी गुरुपौर्णिमे निमित्ताने आपल्या शिष्यांना पिंपळ आणि चिंचाचे वृक्ष भेट देत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि 'जीओ टॅगिंगची' नजर

महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा) शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विकासकामांचे तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय),जिओ-टॅगिंग आणि जीआयएस मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

युवा हेच आपल्याला अभिनेता बनवतात... कंगना राणावतने चुकीचे वक्तव्य केले असेल, तर ही शरमेची बाब : अभिनेता सोनू सूद

युवा हेच एखाद्याला अभिनेता बनवतात.. तुम्ही ॲक्टर असाल किंवा डॉक्टर, जनता तुमच्या सोबत आहे तोपर्यंतच तुमचे अस्तित्व आहे.. कंगना राणावतने चुकीचे वक्तव्य केले असेल, तर ही शरमेची बाब आहे.. बोलण्याआधी विचार केला पाहिजे, असे वक्तव्य अभिनेता सोनू सूद याने केले आहे.. सोनू सूद याने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डी येथे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली.. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सोनू सूद याने कंगना राणावतसह विविध विषयांवर भाष्य करत, भविष्य काळात राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत..

चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याची अजब कारनामा...

शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील स्टेट बँक परिसरातील 56 गाडे व्यापारी संकुलात एका भुरट्या चोराने चोरीची भन्नाट आणि अजब शक्कल लढवली आहे.ओळख लपवण्यासाठी या चोराने स्वतःचे कपडेच काढून चेहरा झाकला.त्यानंतर त्याने संकुलातील एसीची कॉपर वायर आणि कॉम्प्रेसरची चोरी केली.चोरलेली ही महागडी वायर आणि साहित्य साठवण्यासाठी चोराने स्वतःच्याच पॅन्टचा पोत्यासारखा वापर केला आणि तिथून पोबारा केला.हा संपूर्ण निर्वस्त्र चोरट्यांचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सांगितले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आंदोलन करायला निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले

पुणे महानगरपालिकेतील MPSC द्वारे घेण्यात आलेल्या औषधनिर्माण अधिकारी भरती परीक्षेतील घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन

या प्रकरणात महापौरांच्या निकटवर्तीय व्यक्तीचा सहभाग असल्याचे गंभीर आरोप

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी

तपास पूर्ण होईपर्यंत पुणे महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी..

डॉक्टर मारहाण प्रकरणाचा अहवाल केडीएमसी आयुक्तांना सादर

डोबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या मारहाणीचा अहवाल आयुक्त अभिनव गोयल यांनी आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागितला होता. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी अहवाल तयार करुन तो आयुक्तांना सादर केला आहे. या अहवाल प्रकरणी आयु्क्त काय कार्यवाही करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नालासोपाऱ्याच्या कळंब येथील तुळशी रिसॉर्टमध्ये हवेत गोळीबार

नालासोपाऱ्याच्या कळंब येथील तुळशी रिसॉर्टमध्ये हवेत गोळीबार केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आसून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी २.३० पर्यंत स्थगित

राहुल गांधींनी अमित शहांवर आरोप केल्यानंतर लोकसभेत गोंधळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २.३० पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

जल जीवन मिशनच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू 

अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील धाकदायक घटना घडली आहे. कु. नायरा संजू बुसुम असं गड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. कोरडा गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळाची पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले होते.

MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ अकोल्यात युवक काँग्रेसचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन..

महाराष्ट्रातील CET आणि MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप होत आहे, अशातच अकोला युवक काँग्रेसने आज शहरातील तोष्णीवाल लेआउट परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनातून पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. तसेच विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.

पणदरे येथे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास...? 

बारामती तालुक्यातील पणदरे येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास केली असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे.अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी मार्केट येथील साई चौक या ठिकाणी गुप्ता मोबाईल्स या दुकानात झालेल्या मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना २५ जुलै रोजी घडली आहे

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी

- आरोपी महेश केदार यांच्याकडून जामिनासाठी अर्ज

- 3 ऑगस्ट पुढील तारखेला जामिन अर्जावर होणार युक्तिवाद

- इतर तीन अर्जांवर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी पुढची तारीख मागितली

- निशाणी क्र 189 वर पेन्ड्राईव्ह संदर्भातील लेखी म्हणणे सरकारी पक्षाकडून न्यायालयासमोर सादर. त्यासोबत पेन्ड्राईव्ह दिला होता मात्र आरोपीच्या वकिलाने तो रिसिव्ह केला नाही.

एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरण 

एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक काल पासून नंदुरबारमध्ये तळ ठोकून आहेत.

आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे - राहुल गांधी 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत परिक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा करत आहेत. त्यामध्ये राहुल गांधी आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे असंही म्हणाले.

संत आणि देव भेटीची भक्ती सोहळा रंगला

आज गोपाळ काल्याने आषाढी यात्रेची सांगता झाली. दरम्यान आज सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत आणि देवभेटीचा सोहळा रंगला. आषाढीसाठी आलेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका यासह इतर दहा मानाच्या पालख्यांनी मंदिरात येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी सर्व संतांच्या पालख्याचे मंदीर समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. टाळ मृदंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने मंदिर व परिसर दुमदुमून गेला.

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

अन्न आणि औषध प्रशासनाने खांडबारा गावात बेकायदेशीर ताडी विक्रीवर धाड टाकून फूड लायसन्स नसलेली आणि संशयित ताडी नष्ट केली. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले, तरी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.अनेक दिवसांपासून तक्रारी असतानाही स्थानिक यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष का केले परवान्याविना आणि निकृष्ट दर्जाची ताडी इतके दिवस उघडपणे कशी विकली जात होती असे सवाल नागरिक विचारत आहेत.

जालना-अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाच्या संवाद बैठकीला सुरुवात

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पार पडत आहे संवाद बैठक...

29 ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर बैठक..

बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद,मनोज जरांगे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष

अकोल्यात भरधाव ट्रकचा धिंगाणा तर 8 ते 10 वाहनांसह महागड्या कारचे नुकसान

अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात भरधाव ट्रकने मंगळवारी अक्षरशः धिंगाणा घातला....तर भरधाव ट्रकने आठ ते दहा दुचाक्यांसह रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका महागड्या कारला जोरदार धडक दिल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.... तर यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... तर स्थानिकांनी चालक मद्यधुंद असल्याचा आरोप केला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

अमित शहांच्या दौऱ्यावरून भाजप-काँग्रेस आमने सामने

अमित भाई राजकीय कार्यक्रमाला येत नाहीत काँग्रेस याला राजकीय वळण देत आहे. काँग्रेस ने ज्या पद्धतीने आंदोलन करू असं म्हणलं आहे, भाजप काँग्रेसला आव्हान देते आहे की "इलाका तुम्हारा धमाका हमारा रहेगा", जिथे तुम्ही आंदोलन करणार आहेत तिथे आम्ही अमित भाई यांचे जंगी स्वागत करणार. गनिमी काव्याने जर त्यांनी काही केलं तर काँग्रेस नेत्यांना पुण्यात इथून पुढे उजळ माथ्याने फिरता येणार नाही, असा इशारा भाजप ने काँग्रेस ला दिला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यावरून आता काँग्रेस आणि भाजप आमने सामने आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापूरची पंचगंगा यंदा तिसऱ्यांदा पात्र बाहेर पडली आहे. जिल्ह्यातले 30 बंधारे पाण्याखाली गेली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवरून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्याची तहान भागवणारे राधानगरी धरण सध्या 97 टक्के भरले आहे

पश्चिम साताऱ्यात मुसळधार पाऊस; कोयना 83 टीएमसीवर, धरणांतून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असून धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता 83 टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1 हजार 50 क्युसिक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

४० ते ४५ किलोमिटर वेगाने किनारपट्टी भागात वारे वाहण्याची शक्यता

गेल्या चोवीस तासात ३७ मिलिमिटर सरासरी पाऊस

दोन महिन्यात सरासरीच्या ५३ टक्के झाला पाऊस

पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना पत्र

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा अरविंद शिंदे यांचा आरोप

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचा वरदहस्त असलेल्या भूमीग्रीन कंपनीला रेट मारून पडले पात्र ठरवण्यासाठी अटींमध्ये करण्यात आला बदल

४०० कोटींचे काम असलेले ९६७ कोटींपर्यंत पोहोचले असून यामध्ये पुणेकरांची लूट सुरू आहे

निजामांनी आणि इंग्रजांनी केलेली लूट देखील किरकोळ वाटावी अशी लूट सध्या पुणे महापालिकेत सुरू असल्याचा आरोप

पंढरपुरात एनडीआरएफ पथक तैनात; भीमा नदीची पाणी पातळी वाढल्याने सर्व बंधारे गेले पाण्याखाली

उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर मध्ये भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे. पंढरपूर मध्ये अजूनही वारकरी आहेत ते नदीकाठी जाऊन स्नान करत असतात. त्यामुळे कोणताही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकीएन यांच्या आदेशानुसार एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी नदीकाठी जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सांगली बाजार समितीचे त्रिभजन कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द, भाजपाला धक्का

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. राज्याच्या सहकार विभागाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करत कवठेमहांकाळ आणि जत कृषी उत्पन्न बाजार समिती नव्याने निर्माण करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाकडुन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धाव घेण्यात आली होती. ज्यावर कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकारच्या त्रिभजनाच्या आदेश रद्द केला आहे.

कुडाळमध्ये विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

कुडाळ शहरातील गणेशनगर येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी पती सिद्धिविनायक कुडाळकर याला अटक केली आहे. पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर असून आज त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी सकाळी सौ.तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर तीचे भाऊ भूषण सांगेलकर यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

मराठवाड्यात पाणीसाठ्याची चिंताजनक परिस्थिती

पावसाळा अर्धा संपतोय दमदार पाऊस नसल्यानं मराठवाड्यात पाणीसाठ्याची चिंताजनक परिस्थिती आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर, जालना शहरासह जायकवाडी धरणाच्या आजूबाजूला असलेल्या गावाच्या पाण्याचे टेंशन दूर झालंय. कारण नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यात पाण्याचा विसर्ग वेगात सुरू आहे. त्यामुळं आज सकाळी ९ वाजेपर्यंत जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा ६६.२० टक्क्यांपर्यंत पोहचला.

पंढरपुरात चंद्रभागा दुथडी; चंद्रभागेच्या पात्रात उतरण्यास भाविकांना मनाई

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून भीमा नदी पात्रात जवळपास 61 हजार इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी पंढरपुरात पोचल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे.

दरम्यान पोलीस प्रशासनाने भाविकांना नदीपात्रास जाण्यास मनाई करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व घाटांवर बॅरिकेडस लावण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनी धरण 100 टक्के भरले आहे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून 61 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच वीर धरणातून ही जवळपास 5 क्युसेक विसर्ग निरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?

लातूरमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याच समोर येत आहे, मागच्या 20 दिवसात वेगवेगळ्या चार स्कूलबस अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत, तर चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ येथील वटसिद्धनाथ प्राथमिक आश्रम शाळेचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, शाळेतील स्कूलबस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक होताना पाहायला मिळाली,या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारामुळे अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाअभावी टोमॅटो शेती धोक्यात, वडवळ शिवारातील शेतकरी अडचणीत, टोमॅटो शेतीला घागरीने पाणी घालण्याची वेळ

लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे, सुरुवातीला झालेल्या जेमतेम पावसावर उगवून निघालेले कवळी शेती पिक आता सुकू लागली आहेत, चाकूर तालुक्यातल्या वडवळ शिवारात टोमॅटो शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र दोन महिन्यापासून पाऊस होत नसल्याने, या भागातील शेतकऱ्यांना आता घागरीने पाणी देऊन टोमॅटो शेती जगवण्याचा प्रयत्न करावा लागतो आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून हजारो साईभक्त साई चरणी नतमस्तक

साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डी नगरी साई नामाच्या जयघोषाणे दुमदुमून गेली आहे.. साईबाबांना गुरूस्थानी मानून साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक साई नगरीत दाखल झाले आहेत.. साई मंदिराच्या दर्शन रांगा आणि शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.. साई मंदिर तसेच गुरूस्थान मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.. साई दर्शनानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय.. देशभरातून आलेले साईभक्त साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत

भूम पोलीस निरीक्षकांची बदली करा, अन्यथा १४ ऑगस्टपासून भूम तालुका बंदचा नागरीकांचा इशारा

धाराशिवच्या भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत नागरिकांच्या वतीने पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बदली करण्यात आली नाही, तर १४ ऑगस्टपासून भूम तालुका बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Maharashtra News Live Update: दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत पावसाची दमदार हजेरी; रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी

दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा ७ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा होती. मात्र पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली होती. रोहिणी नक्षत्रातील अनेक कामे रखडली असून दुबार पेरणीची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होते.

महाबळेश्वर-मेढा रस्त्यावरील केळघर घाट सर्व वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-मेढा-सातारा रस्त्यावरील केळघर घाटात काळा कडा ठिकाणी वारंवार दरड कोसळून दगड आणि माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून आज २८ जुलै पासून हा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेतला असून जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रवाशांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा असे पत्रक काढण्यात आले आहे..

पर्यायी मार्ग

१) मेढा - मालदेव मंदिर - मार्ली - भिलार - महाबळेश्वर

२) मेढा - कुसुंबी - सह्याद्रीनगर - माचुतर - महाबळेश्वर

नीट पेपरफुटी प्रकरणात आज दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी

सी बी आय ने दाखल केलेले दोषारोपपत्रात १३ आरोपींची नावे

सी बी आय च्या अर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर ठेवले जाणार

यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल यांच्या नावांचा समावेश

शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, प्रल्हाद कुलकर्णी, तेजस शहा, डॉ. मनोज शिरुरे, शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, मनीषा हवलदार यांच्या विरोधात सुद्धा दोषारोपपत्र सादर

अर्जुन आनंद यांची दिल्ली येथील राउज एवेन्यू कोर्ट मध्ये सुरू असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सी बी आय चे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

डिजिटल फॉरेन्सिक अहवाल, हस्ताक्षर तज्ञांची मतं आणि शैक्षणिक विभागातील तज्ज्ञांची मतं सी बी आय ने घेतले जाणून

ताम्हिणी घाट मार्ग गुरुवारपासून हलक्या व प्रवासी वाहनांसाठी सुरू होणार

अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला ताम्हिणी घाटातील पुणे–कोलाड राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५३ एफ)

गुरुवारपासून हलक्या व प्रवासी वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.

पुण्यात होणार श्वान गणना! कुत्र्यांच्या मोजणीसाठी २५ लाख रुपयांची निविदा जारी

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यांची संख्या दीड लाखाच्या पुढे गेली आहे. केवळ काही हजारांत कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया होत असताना आता पुणे महापालिकेने श्वानांची गणना करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची निविदा जाहीर केली आहे. मागील वर्षी कुत्रा चावण्याच्या सुमारे ३० हजार ६१३ घटना घडल्या असल्याची माहिती आहे मात्र असं असतानाच आता भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी २५ लाख रुपयांचे टेंडर जारी करण्यात आले आहे. या टेंडर ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये महापालिका हद्दीतील भटक्या व मोकाट श्वानांची गणना करण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करणे, ऍप्लिकेशन विकसित करणे व त्याची गणना करणे असं निविदा जारी केली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर परिसरात वाहतूक नियमन; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: लॉटरी लागलीय म्हणत वृद्धेला गंडा; तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला लॉटरी लागली आहे असे सांगत एका ठगाने ६८ वर्षीय वृद्धेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. भगतसिंगनगर येथील कमल सुखदेव शिंदे या घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर दुचाकीवर बसवून राजधानी हॉटेल परिसरात नेले आणि 'लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी बांगड्या साहेबांना दाखवाव्या लागतील' असे सांगत हातातील तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेतल्या. बांगड्या हातात येताच ठगाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कमल शिंदे यांच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यापीठातीलच काही कर्मचारी बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करणारा रॅकेट चालवत असल्याची माहिती साम टीव्ही न्यूज च्या हाती लागली आहे.

Maharashtra News Live Update: - साईबाबांच्या शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह

साईबाबांच्या शिर्डीत आज गुरूपोर्णीमेचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे.. साईबाबांना गुरूस्वरूप मानणारे हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे.. तीन दिवस चालणा-या उत्सवाचा आज दुसरा आणि मुख्य दिवस असून देश विदेशातून आलेल्या भाविकांना आज साईबाबांचे दर्शन मिळावे यासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..

कर्जमाफीची पहिल्या यादीत 50 हजार शेतकऱ्यांची नावे

कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात या योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या एक लाख ६१ हजार १४८ शेतकऱ्यांची नावे पाठविण्यात आली आहेत. त्यांपैकी ५१ हजार शेतकऱ्यांच्या नावाची जिल्हा बँकेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आणि ५० हजार शेतकऱ्यांच्या नावाची राष्ट्रीयीकृत बँकांची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात एक लाख एक हजार ४७० शेतकरी कर्जमुक्तीला पात्र ठरले आहेत.यामुळे राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा बँकेच्या ३७ हजार १८८ शेतकऱ्यांनीच आतापर्यंत आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली. यादीत नाव जाहीर झालेल्या शेतकऱ्यांपैकी ६४ हजार २८२ शेतकरी या प्रक्रियेच्या दूर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com