बदलतं हवामान आता डासांच्या वाढीलाही कारणीभूत ठरतंय. वाढतं तापमान, अनियमित पाऊस आणि घरांभोवती किंवा शहरांमध्ये साचणारं पाणी यामुळे एडीज डासांना वर्षातील बराच काळ पोषक वातावरण मिळतंय. त्यामुळे डेंग्यू हा केवळ पावसाळ्यात होणारा आजार आहे असं मानणं आता योग्य ठरणार नाही.
एम्सच्या मेडिसिन विभागातील डॉक्टर नीरज निश्चल यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, वेगवेगळ्या भागांमध्ये डासांमध्ये त्यांच्या वातावरणानुसार काही आनुवंशिक बदल होताना दिसतोय. तसंच डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा त्यांच्यावर पूर्वीसारखा परिणाम होत नसल्याचंही काही ठिकाणी दिसून आलंय. यामागचं मुख्य कारण म्हणजे हवामान आणि पर्यावरणातील बदल. त्यामुळे वर्षातील जास्त काळ डासांना वाढण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होत आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यांप्रमाणे, आता उन्हाळा अधिक काळ जाणवतो तर हिवाळाही पूर्वीसारखा कडाक्याचा राहिलेला नाही. त्यामुळे डासांसाठी पोषक वातावरण जास्त काळ टिकतं. घराच्या आसपास ठेवलेले कूलर, कुंड्या, छतावरची भांडी, जुने टायर किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साचलेलं पाणी डासांच्या वाढीसाठी योग्य ठरू शकतं.
एडीज डासाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज नसते. अगदी थोडंसं स्वच्छ पाणी साचलेलं असलं तरी त्यात तो वाढू शकतो.
आज जागतिक मच्छर दिनानिमित्त डेंग्यू पसरवणाऱ्या डासांबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
एडीज डास दिवसा जास्त एक्टिव्ह असतो. त्यामुळे तो प्रामुख्याने दिवसा चावतो. मात्र, डेंग्यूचा डास फक्त दिवसा चावतो, हे पूर्णपणे खरं नाही. घरात पुरेसा प्रकाश असेल, माणसांची हालचाल सुरू असेल किंवा डासासाठी परिस्थिती अनुकूल असेल तर तो इतर वेळेतही चावू शकतो. त्यामुळे केवळ दिवसा डासांपासून काळजी घ्यायची आणि रात्री धोका नाही असा समज ठेवणं चुकीचं आहे.
तज्ज्ञांच्या यांच्या मते, डास माणसांकडे आकर्षित होण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करतात. आपण श्वास सोडताना बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड, शरीराचं तापमान आणि त्वचेतून बाहेर पडणारे नैसर्गिक रसायन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
त्वचेच्या वासात होणारे बदलही डासांना एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित करू शकतात. त्यामुळे काही लोकांना इतरांच्या तुलनेत डास जास्त चावतात असं दिसून येतं.
डासांना पळवण्यासाठी वापरली जाणारी औषधं, मशीन किंवा इतर उपाय केल्याने काही काळासाठी घरातील डास कमी होऊ शकतात. मात्र डासांची पैदास होण्याची ठिकाणं तशीच राहिली तर ते पुन्हा घरात येतात.
कुंड्यांच्या खाली साचलेलं पाणी, कूलर, फुलदाणी, बादल्या, जुने डबे, टायर तसंच छत किंवा बाल्कनीत साचलेलं पावसाचं पाणी ही डासांच्या वाढीची संभाव्य ठिकाणं आहेत. त्यामुळे केवळ डासांना पळवण्यावर भर देऊन उपयोग नाही. डास जिथे वाढू शकतात, अशी ठिकाणं शोधून तीच आधी नष्ट करणं हा डासांपासून बचाव करण्याचा अधिक प्रभावी मार्ग आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.