आजकाल जीवनशैलीमुळे अनेक आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये किडनीसंबंधीत आजारांमध्येही वाढ झालीये. किडनीचा कॅन्सर हा एक गंभीर आजार मानला जातो. या कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. अनेक महिने किंवा कधी वर्षानुवर्षेही हा आजार शरीरात शांतपणे वाढत राहू शकतो.
बहुतेक वेळा लक्षणं दिसू लागेपर्यंत हा कॅन्सर पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. अशा वेळी उपचार करणं अधिक कठीण होऊ शकतं. त्यामुळे शरीरात होणाऱ्या अगदी छोट्या बदलांकडेही दुर्लक्ष करू नये असा सल्ला डॉक्टर देतात.
किडनी कॅन्सरचे सुरुवातीचं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवीत रक्त दिसून येणं. वैद्यकीय भाषेत याला 'हिमॅच्युरिया' असं म्हटलं जातं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, लघवीत रक्त दिसलं म्हणजे प्रत्येक वेळी किडनी कॅन्सरच असतो असे नाही. तरीही हा बदल कधीही दुर्लक्षित करू नये. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
किडनीमध्ये तयार होणारा ट्यूमर अनेकदा कोणतीही वेदना किंवा इतर त्रास न देता वाढत राहतो. ट्यूमर जेव्हा किडनीतील लघवी साठवण्याच्या भागावर म्हणजेच रेनल पेल्विस आणि कॅलिसियल सिस्टिमवर परिणाम करू लागतो तेव्हा लघवीत रक्त दिसू लागतं. काही जण रक्त येऊन नंतर ते आपोआप थांबलं की सर्व काही ठीक झालं असं समजतात. मात्र हा निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो.
किडनी कॅन्सर कोणालाही होऊ शकतो. मात्र काही लोकांमध्ये त्याचा धोका तुलनेने जास्त असतो. यामध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक, धूम्रपान करणारे, लठ्ठपणाचा त्रास असलेले, उच्च रक्तदाबाचे रुग्ण आणि ज्यांच्या कुटुंबात आधी कोणाला किडनी कॅन्सर झाला असेल अशा व्यक्तींचा समावेश होतो. या गटातील व्यक्तींना लघवीत एकदाही रक्त दिसले, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये.
लघवीत रक्त दिसलं तर डॉक्टर तुम्हाला प्रथ सर्वप्रथम युरिन टेस्ट केली जाते. यानंतर जर गरज असल्यास अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन किंवा इतर इमेजिंग तपासण्या केल्या जाऊ शकतात. या तपासण्यांमुळे किडनी आणि संपूर्ण युरिनरी ट्रॅक्टची तपासणी करता येते. यामुळे रक्तस्रावाचं कारण संसर्ग आहे, किडनी स्टोन आहे की किडनी कॅन्सरसारखा गंभीर आजार आहे हे डॉक्टरांना समजण्यास मदत होते.
किडनी कॅन्सर सुरुवातीलाच निदान झालं तर त्यावर प्रभावी उपचार करणं शक्य असतं. अनेक रुग्ण पूर्णपणे बरेही होऊ शकतात. पण या आजारात सुरुवातीला वेदना किंवा ठळक लक्षणं दिसत नसल्यामुळे अनेक रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे पोहोचतात. त्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात.
डॉक्टरांनी स्पष्ट केलंय की, लघवीत जर अचानक रक्त दिसलं मग ते फक्त एकदाच दिसून आलं तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जेणेकरून कोणतीही समस्या असल्यास त्यावर उपचार कऱणं सोपं होतं. यामुळे रूग्ण बरी होण्याची शक्यताही वाढते.