उल्हासनगरमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
किरकोळ वादातून तरुणाला मारहाण
गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उल्हासनगर पोलिसांकडून दोन आरोपींना अटक
उल्हासनगरमध्ये धक्का लागल्याच्या रागातून तरुणाची हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून एका तरुणाला दोघांनी भरचौकात बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक केली. ज्या ठिकाणी आरोपींनी तरुणाला मारहाण केली त्याच परिसरात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास व्हिनस चौकातील मास्टर वाईन शॉपमध्ये दारू घेत असताना नितेशचा आरोपी विकास पगारे आणि विक्रम बावगे यांच्यासोबत धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यानंतर दोन्ही आरोपींनी नितेशचा जंगम हॉटेलजवळील सार्वजनिक रस्त्यापर्यंत पाठलाग केला. तिथे त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत नितेश गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे काही तासांतच विकास पगारे आणि विक्रम बावगे या दोघांना अटक केली.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली. ही हत्याकांडाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याच सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिस आरोपींपर्यंत पोहचले. या प्रकरणाचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.