SHOCKING RAIGAD TRAGEDY: MOTHER POISONS HERSELF AND FOUR CHILDREN, THREE DEAD Saam tv
क्राईम

Shocking: विवाहित महिलेनं आधी स्वत:नं विष प्राशन केलं, नंतर ४ मुलांनाही पाजलं; रायगडमधील धक्कादायक घटना

Raigad Crime News: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने स्वतः विष प्राशन करून आपल्या चार मुलांनाही ते पाजल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे.

Bharat Jadhav

  • रायगडच्या माणगाव तालुक्यात विषप्राशनाची धक्कादायक घटना घडली.

  • ३३ वर्षीय विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करून चार मुलांनाही विषारी पेय पाजल्याचा आरोप.

  • या घटनेत आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला.

रायगडमधील माणगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून एका ३३ वर्षीय विवाहित महिलेने स्वतः विषाचे सेवन केलं. त्यानंतर आपल्या चार मुलांनाही विषारी पेय पाजल्याची धक्कादायक घटना खरवली आदिवासी वाडी येथे घडली. या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या घटनेत आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला तर एक मुलगा व एक मुलगी यांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशा धर्मा जाधव (वय ३३), दुर्वा जाधव (वय ७) आणि नंदिनी जाधव (वय ४) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर रवी जाधव (वय ८) आणि राजश्री जाधव (वय ४) या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खरवली आदिवासी वाडी येथील आशा धर्मा जाधव (वय ३३) यांनी शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास थंड पेयामध्ये कोणते तरी मासे मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध मिसळलं आणि ते प्राशन केलं.

त्यानंतर त्यांनी आपल्या चार मुलांना देखील तेच पेय दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी ही बाब समजताच त्यांनी तत्काळ सर्वांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी मुलांची तपासणी केली. दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्याचा सल्ला दिला.

प्राथमिक तपासानुसार ही धक्कादायक घटना कौटुंबिक वादातून घडली असावी. वादातून निर्माण झालेल्या मानसिक तणाव आणि नैराश्यामुळे महिलेनं असं पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच थंड पेयामध्ये मिसळण्यात आलेले विषारी द्रव्य नेमके काय होते, याबाबतही अधिकृत अहवाल मिळाला नसून त्याची तपास केली जातेय.

या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : पतीपेक्षा पत्नीचं उत्पन्न जास्त असेल तर पोटगी नाही! मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

LPG Rate Today : एलपीजी सिलिंडरवर सरकार देतंय तब्बल ७०० रुपयांची सबसिडी? समोर आली मोठी माहिती

रोज तेल लावल्याने केस खरंच वाढतात का?

Maharashtra News Live Update: लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय

Satara Accident : फलटणजवळ कारचा भीषण अपघात; ३ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, ३ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT