कामावरून काढल्यामुळे दोन मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण केलं.
मुलगी गायब झाल्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी इंद्रायणी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या आरोपींना कल्याण स्टेशनवर अटक केली.
तब्बल चार तासांनी चिमुकलीची सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
पुण्यात काम व्यवस्थित करत नसल्याने ठेकेदाराने दोन कामगारांना कामावरुन काढले. त्या रागातून झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. घडलेल्या घटनेनंतर पोलीसांनी तात्काळ तपास सुरु करत तब्बल चार तासांमध्ये चिमुकलीला आरोपींच्या तावडीतून सोडवले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला कल्याण स्थानकातून बेड्या ठोकल्या आहेत. प्रिन्स पाल आणि ओमनारायण पाल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या बांधकाम साईटवर ठेकेदार हे मजुर पुरविण्याचे काम करतात. प्रिन्स पाल व ओमनारायण पाल हे दोघे जण व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांनी दोघांना कामावरुन काढले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन त्यांनी या ठेकेदाराची ३ वर्षांच्या मुलीचे सोमवारी अपहरण केले. काही वेळात मुलगी न दिसल्याने पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी तडक कारवाई सुरु करत तपासाचा वेग वाढवला. तपासादरम्यान पोलिसांना काम सोडून जाणार्यांपैकी चार कामगार बिहारच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार इंद्रायणी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने कल्याण रेल्वे स्टेशनवर जेरबंद करण्यात आले. तसेच तब्बल चार तासाने मुलीची सुटका करण्यात आली.
दरम्यान पोलिसांनी मुलीला सुखरूप पालकांच्या हातात सुपूर्त केले आहे. तसेच पोलिसांनी अपहरणकर्त्यांना जेलचा रस्ता दाखवला आहे. पोलीस या आरोपींवर कोणती कठोर कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.