Crime News: उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ तब्बल पाच महिन्यांनंतर उलगडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. वैज्ञानिक पुरावे, फॉरेन्सिक तपास आणि एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) अहवालाच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेचा पती अफजल याला अटक केली आहे. पत्नीला औषध देण्याच्या बहाण्याने पाण्यात विषारी पदार्थ मिसळून पाजल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली होती. मार्गुबपूर येथील रहिवासी मोहम्मद अनिश यांनी बहादराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आपल्या बहिणीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या पतीने तिला विष देऊन ठार मारल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत विविध पुरावे गोळा केले आणि शवविच्छेदनानंतर व्हिसेराचे नमुने एफएसएलकडे पाठवले. काही महिन्यांनंतर आलेल्या अहवालात महिलेच्या शरीरात विषारी पदार्थ आढळल्याचे स्पष्ट झाले. या निष्कर्षानंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने पुढे नेला आणि परिस्थितीजन्य तसेच वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे संशयाची सुई पती अफजलकडे वळली.
दरम्यान, आरोपी अटकेपासून बचाव करण्यासाठी फरार झाला होता. मात्र, तो परिसर सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शांतारशाह परिसरातील बढेरी राजपूतन महामार्ग पुलाजवळ सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. पत्नी सतत आजारी असल्याने तिला विष देऊन मारण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.