सध्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर कितीने वाढतोय याकडे लक्ष आहे. त्यातच रेल्वे इंजिनियर्सनी आठव्या वेतन आयोगासमोर पगारवाढीसोबत बऱ्याच महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. भुवनेश्वरमध्ये झालेल्या बैठकीत ऑल इंडिया रेल्वे इंजिनियर्स फेडरेशन (AIREF) आणि ईस्ट कोस्ट रेल्वे इंजिनियर्स असोसिएशन (ECoREA) यांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या सदस्य सचिवांकडे त्यांच्या समस्या मांडल्या.
संघटनांच्या मते, सध्याची वेतनवाढ महागाई आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत अपुरी आहे. सहाव्या वेतन आयोगानंतर रेल्वे इंजिनियर्सच्या पगारात विसंगती वाढली आहे. बरेच गैर-तांत्रिक आणि गैर - सुरक्षा विभागातल्या कर्मचाऱ्यांना इंजिनियर्सपेक्षा जास्त सॅलरी मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. सुरक्षा आणि तांत्रिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या इंजिनियर्सना त्यांच्या कामानुसार योग्य वेतन मिळावं अशी त्यांची मागणी आहे.
तसेच, पाचव्या वेतन आयोगापर्यंत असलेली वेतन श्रेणी परत लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे विविध पदांमधल्या वेतनातला असमोल कमी होईल, असं संघटनांचं म्हणणं आहे.
रेल्वे इंजिनियर्सना ग्रुप-बी दर्जा देण्याची मागणीही या बैठकीत ठळकपणे करण्यात आली. सध्या भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप-बी पदांची संख्या खूप कमी असून, त्यामुळे इंजिनियर्सना बढतीच्या संधी मर्यादित मिळतात. ग्रुप-बी पदांचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीप्रमाणे ७.५ टक्क्यांपर्यंत वाढवावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे. त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी वाढेल आणि कर्मचाऱ्यांचा उत्साहही वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आठव्या वेतन आयोगाच्या बैठका देशभारतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू आहेत. कर्मचारी संघटना, रिटायरमेंट झालेले आणि विविध विभागांचे प्रतिनिधी आपल्या मागण्या आयोगासमोर मांडत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांशिवाय इतर केंद्रीय कर्मचारी संघटनांनीही फिटमेंट फॅक्टर वाढवणं, भत्त्यामध्ये सुधारणा, एचआरए, एमएसीपी आणि पेन्शन व्यवस्थेत बदल करण्याच्या मागण्या केल्या आहेत.