जळगाव : शेतातून चांगले उत्पन्न घेण्यासाठी कर्ज घेऊन पैसे खर्च करत असतो. मात्र अपेक्षित उत्पन्न व भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. यातूनच जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे. ही घटना मकरसंक्रांतीचा सण एक दिवसावर असण्यापूर्वीच उघडकीस आली. घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील लीलाधर कौतिक पाटील (वय ४९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. लीलाधर पाटील हे पत्नी आणि दोन मुलांसह कुसुंबा गावात वास्तव्याला होते. शेती आणि मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपासून लीलाधर पाटील यांच्या हातांना काम नव्हते. तसेच त्यांनी खासगी कर्जही काढले होते. शिवाय शेतीतून उत्पन्न न आल्यामुळे कर्जफेडीची चिंता होती. त्यामुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते.
घरात कोणी नसताना घेतला गळफास
दरम्यान रविवारी त्यांच्या पत्नी सविता गावी गेल्या होत्या. तर त्यांचा ११ वर्षीय मुलगा चेतन हा बाहेर गेला होता. यामुळे लीलाधर पाटील घरात एकटेच होते. याच वेळी त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेचारला त्यांचा मुलगा चेतन हा घरात आला असता त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. तो आक्रोश करीत घराशेजारी राहणाऱ्या काकांकडे आला व घटना सांगितली.
परिवाराचा आक्रोश
नातेवाइकांनी त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक गफूर तडवी तपास करीत आहेत. त्यांच्या मागे आई निर्मला, दोन भाऊ, तीन बहिणी, पत्नी सविता, मुलगा चेतन आणि मुलगी प्रांजल असा परिवार आहे. घरातील कमावता पुरुष गेल्याने परिवार संकटात सापडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.