Beed Onion News : कांद्याने आणलं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, १७ गोण्या कांदा विकला अन् हाती पडला १ रुपया!

Beed Kanda Bajar Bhav: मायबाप सरकार आता मुलांच्या शिक्षणाची फिस कशी भरू ? 1 रुपयात काय करू आता तुम्हीच सांगा...कांदा उत्पादक शेतकरी महिलेचा सवाल..
Beed Onion News
Beed Onion NewsSaam Tv

Beed Farmer News : अतिवृष्टीने उद्धवस्त झालेला शेतकरी कुठंतरी उभं राहण्याचा प्रयत्न करत असतांना आता सुलतानी संकट त्याच्या मानगुटीवर बसलंय. यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले कांदे बाजारात विकले तेव्हा 17 गोनी कांद्याचा हाती केवळ 1 रुपया आला आहे. यामुळं सरकार सांगा आम्ही जगायचं कसं ? असा सवाल महिला शेतकऱ्याने केलाय.

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यात असणाऱ्या बावी येथील शेतकरी नामदेव यांनी आपल्या 3 एक्कर शेतात कांद्याची (Onion) लागवड केली होती. यासाठी त्यांना कांद्याचे रोप, खुरपणी यासह मशागतीसाठी जवळपास 1 लाख रुपये खर्च आला होता. मात्र कांदा चांगला आल्यानं त्यांनाही वाटलं केलेला खर्च वगळता दोन पैसे आपल्या कुटुंबासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी राहतील. मात्र नियतीला हे मान्य नव्हतं.

Beed Onion News
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

नामदेव लटपटे यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा, 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करून अहमदनगर येथील बाजार समितीत असलेल्या, संतोष लहानु सूर्यवंशी यांच्या आडतवर नेऊन विकला. यादरम्यान त्यांना खर्च वजा करून 17 कांद्याच्या गोण्यांची पट्टी निव्वळ शिल्लक रक्कम 1 रुपया मिळाली आहे. यामुळं थट्टाचं झाल्याने शेतकरी नामदेव लटपटे हवालदिल झाले आहेत.

तर याविषयी शेतकरी नामदेव लटपटे यांच्या पत्नी मनीषा लटपटे म्हणाल्या, की या कांद्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलीय. दोन पैसे मिळतील असं वाटलं होतं. कुटुंब चालेल मुलांचे शिक्षण होईल असं वाटलं होतं. मात्र 17 गोणी कांद्याचे फक्त एक रुपये आलाय.

त्यामुळे या कांद्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलांचे 10 हजार रुपये बाकी असलेले द्यावे कुठून ? मुलांचे शिक्षण कसं करावं ? परीक्षेची फीस कुठून भरावी ? कुटुंब कसं चालवावं ? आता मायबाप सरकार तुम्हीच सांगा जगायचं कसं ? असे एक ना अनेक प्रश्न नामदेव लटपटे यांच्या पत्नीने सरकारला विचारलेत.

Beed Onion News
Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांसह तरुणींचा धुडघुस; कार्यक्रम बंद झाल्यानंतर तुफान हाणामारी

तर याविषयी बावी गावचे सरपंच नवनाथ गर्जे म्हणाले, की नामदेव लटपटे यांनी दोन दिवसापूर्वी अहमदनगर येथील बाजार समितीच्या आडत दुकानावर कांदा विक्री केला. मात्र त्यांना सतरा गोणी कांद्याचा अवघा एक रुपया मिळाला सरकार म्हणत नाफेड खरेदी केंद्र सुरू करू मात्र इथून नाशिकला जाण्यासाठी एका गोणीला शंभर रुपये जातात मग असाच भाव मिळाला तर शेतकऱ्यांना तिथून वापस यायचं कसं त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध करत असून सरकारने अनुदान स्वरूपात आमच्या शेतकरी बांधवांना मदत करावी अशी मागणी सरपंच नवनाथ गर्जे यांनी केलीय.

Beed Onion News
Ulhasnagar : किरकाेळ कारणावरुन उल्हासनगरातील इमली पाड्यात युवकाची हत्या

दरम्यान बावी गावात नामदेव गर्जे हे एकटेच कांदा उत्पादन घेत नाहीत. तर गावातील 70 टक्के शेतकरी हे कांद्याचे उत्पन्न घेतात. यामुळे या शेतकऱ्यांची देखील परिस्थिती नामदेव लटपटे यांच्या पेक्षा वेगळी नाही. त्यामुळे अगोदरच अतिवृष्टीच्या खाईत हतबल झालेला शेतकरी पुन्हा सुलतानी संकटांने हतबल होत आहे. यामुळं आता तरी या सरकारला जाग येईल का ? आणि कांद्याने डोळ्यात पाणी आणलेल्या या शेतकऱ्यांना सरकार आधार देईल का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com