भारतीय संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव अखेर फॉर्ममध्ये परतला आहे. वेस्टइंडीजविरूद्धच्या सुरूवातीच्या २ सामन्यांमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर अखेर तिसऱ्या सामन्यात त्याची बॅट तळपली आहे. या तिसऱ्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना ८३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने या मालिकेत १-२ ने कमबॅक केले आहे. दरम्यान या खेळीदरम्यान त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
सूर्यकुमार यादवने या खेळीदरम्यान अवघ्या २३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. ज्यात १० चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. या ४ षटकारांसह सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले आहेत. भारतीय संघाकडून विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर १०० षटकार मारणारा तो तिसराच फलंदाज ठरला आहे.
टी- २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वात जलद १०० षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने ५० व्या सामन्यात हा कारनामा करून दाखवला आहे. कर्णधार रोहित शर्माने ९२ व्या सामन्यात हा कारनामा केला होता. तर विराट कोहलीने १०४ सामन्यांमध्ये हा कारनामा करून दाखवला होता. (Latest sports updates)
वेस्टइंडीजमध्ये असा कारनामा करणारा पहिलाच फलंदाज...
सूर्यकुमार यादवने या डावात ८३ धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह तो वेस्टइंडीजमध्ये खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा,रिषभ पंत आणि तिलक वर्माच्या नावे प्रत्येकी १-१ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी १६० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ८३ तर तिलक वर्माने ४९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.