
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारताकडून पराभव होणं हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी मोठा धक्का आहे.
कारण गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाने नॉकआऊट सामन्यांमध्ये चांगलाच दबदबा बनवून ठेवला होता. आता भारताने पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वनडे क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
स्टीव्ह स्मिथने निवृत्ती जाहीर केल्यानंतर स्टीव्ह स्मिथने म्हटले, ' हा प्रवास खरंच खूप चांगला होता. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. खूप चांगल्या आठवणी आहेत. या संघासोबत राहून २ वर्ल्डकप जिंकणं हे अविस्मरणीय होतं. सर्व खेळाडूंसोबत घालवलेले प्रत्येक क्षण मला लक्षात राहतील.'
निवृत्ती घेण्यामागचं कारण सांगताना स्मिथ म्हणाला, ' आता २०२७ वर्ल्डकप स्पर्धेची तयारी करण्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे. इतर खेळाडूंना संधी निर्माण करुन देण्याची ही योग्य वेळ आहे.'
स्टीव्ह स्मिथला कसोटी क्रिकेटने वेगळी ओळख निर्माण करुन दिली. त्यामुळे त्याने आता कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या निवृत्तीबाबत बोलताना तो म्हणाला, ' मला कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायचं आहे. माझं संपूर्ण फोकस आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल, त्यानंतर वेस्टइंडीजविरुद्ध होणारी कसोटी मालिका आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेवर असणार आहे. मला कसोटी क्रिकेटमध्ये अजून खूप योगदान द्यायचं आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.