
रणजी करंडक स्पर्धेतील अखेरच्या फेरीतील सामने सुरू असून, मेघालय विरुद्ध मुंबई यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात मेघालय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. शार्दुल ठाकूरच्या विखारी गोलंदाजीनं मेघालयच्या फलंदाजांच्या ठिकऱ्या उडवल्या. संघाच्या स्कोअरबोर्डवर २ धावा असताना सहा विकेट तंबूत परतले होते. रणजी ट्रॉफीत गेल्या ९१ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं आहे. तर नकोशा वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मेघालय दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.
शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसीमध्ये मुंबई विरुद्ध मेघालय यांच्यात सामना सुरू आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मेघालय संघानं अवघ्या दोन धावा असताना सहा विकेट गमावल्या. मेघालयची ही दशा करण्यात मुंबईच्या शार्दुल ठाकूरची महत्वाची भूमिका ठरली. त्यानं हॅट्ट्रिकसह चार विकेट घेतल्या. तर मोहित अवस्थीनं दोन विकेट घेतल्या.
शार्दुल ठाकूरने पहिल्याच षटकात सलामीवीर निशांत चक्रवर्ती याला तंबूत धाडलं. त्यानंतर तिसऱ्याच षटकात हॅट्ट्रिक घेत मेघालय फलंदाजीची कंबर मोडून टाकली. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंवर बी अनिरुद्ध, सुमित कुमार, जसकीरतला शून्यावर बाद केलं. शार्दुलची ही रणजी ट्रॉफीतील पहिली हॅट्ट्रिक ठरली.
दरम्यान, मेघालयचा संघ ८६ धावांवरच गारद झाला. अवघ्या २ धावांवर सहा विकेट गमावल्यानंतरही संघानं ८६ धावा केल्या. कोणत्याही संघानं केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. मेघालयकडून सर्वाधिक धावा हिमन यानं केल्या. त्यानं २४ चेंडूंवर ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ धावांची खेळी केली.
६ फलंदाजांचा भोपळा
मेघालयचा संघाचा डाव २४.३ षटकांत अवघ्या ८६ धावांवर आटोपला. शार्दुल ठाकूरनं मुंबईकडून चार विकेट्स घेतल्या. त्यात हॅट्ट्रिकचा समावेश आहे. मोहित अवस्थीने तीन फलंदाजांना गारद केलं. डिसूझानं दोन विकेट घेतल्या. मेघालयचे सहा फलंदाज शून्यावर बाद झाले. फक्त चार फलंदाज दोन आकडी धावा करू शकले. मात्र, संघाला १०० धावांची मजल मारून देण्यात अपयशी ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.