
सुशील थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सोलापूरच्या वेताळ शेळकेचा विजय झाला. त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील यांचा सात गुणांनी पराभव केला. कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शरद पवार, रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. आज अंतिम कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाला. या अटीतटीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये वेताळ शेळके याने सात गुण मिळवून मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याच्यावर मात केली आणि वेताळ शेळके हा 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वेताळ शेळके यास मानाची गदा प्रदान करण्यात आली. विजयानंतर वेताळ शेळकेने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'महाराष्ट्र केसरी होण्याचे माझे स्वप्न होते आणि पृथ्वीराज पाटील यांचे आव्हानही होतं ते मी स्वीकारले आणि आई-वडिलांचा आणि वस्ताद यांना स्वप्न मी पूर्ण केले', असे वेताळ शेळके म्हणाला.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून 800 हून अधिक मल्लांनी हजेरी लावली होती. गेल्या महिन्यात अहिल्यानगर शहरात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम सामन्यात निकालावरून गोंधळ पाहायला मिळाला त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते मात्र कर्जत येथे झालेल्या कुस्ती स्पर्धा शांततेत पार पडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.