बारबाडोसच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. १७ वर्षांनंतर चालून आलेल्या संधीचा भारतीय संघाने दोन्ही हातांनी स्वीकार केला. फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर बारबाडोसमध्ये सेलिब्रेशन झालं. ही तर सुरुवात होती. कारण वर्ल्डकप विजयाचं जंगी सेलिब्रेशन तर भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर होणार आहे.
भारतीय खेळाडू अजूनही बारबाडोसमध्येच आहेत. बारबाडोसमध्ये चक्रीवादळामुळे सर्वच ठप्प पडलं आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू मायदेशात येण्यासाठी अजून निघालेले नाहीत. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोप केली होती. मात्र खराब वातावरणामुळे भारतीय खेळाडूंना थांबावं लागलं आहे. भारतीय संघ बुधवारी (३ जून) भारतात दाखल होणार होता. मात्र आता आणखी उशीर होऊ शकतो. दरम्यान भारतात आल्यानंतर भारतीय संघाची वर्ल्डकप ट्रॉफीसोबत रॅली काढली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, भारतात आल्यानंतर भारतीय खेळाडू दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मुंबईत ओपन बस रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. या रॅलीत भारतीय संघातील सर्व खेळाडू सहभाग घेतील आणि फॅन्सचे आभार मानताना दिसून येतील. मात्र ही रॅली कधी काढली जाणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. यापूर्वी २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी भारताचा संघ भारतात परतल्यानंतर मुंबईत रॅली काढण्यात आली होती.
भारतीय संघाचा फानयलचा सामना २९ जून रोजी पार पडला. या सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू १ जूलै रोजी भारतात येण्यासाठी रवाना होणार होते. मात्र चक्रीवादळामुळे हा प्लान पुढे ढकलला गेला. त्यानंतर बीसीसीआयने चार्टर्ड विमानाची सोय केली होती. मात्र परिस्थिती अनुकूल नसल्याने हा प्लान देखील पुढे ढकलण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.