आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने पाकिस्तानला '४४० चा झटका' दिला. या दोघांनी पाकिस्तानी गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढले. आधी राहुलनं शतकी खेळी साकारून भारताच्या डावाचा पाया भक्कम केला, त्यानंतर लागलीच विराटनंही शतक ठोकून त्यावर कळस रचला.
आशिया चषक स्पर्धा २०२३ मधील सुपर फोरमध्ये भारत - पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना झाला. पण पावसानं खेळ केला आणि सामना थांबला. या सामन्यासाठी दुसरा दिवस राखीव होता. सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले होते. त्याचवेळी पावसानं पुन्हा बरसायला सुरुवात केली.
राखीव दिवशीही पावसाचा खेळ सुरूच राहणार आणि सामना रद्द झाला तर, काय होणार याचेच अंदाज-आडाखे बांधण्यास सुरुवात झाली होती. पण पाऊस थांबला आणि खेळ सुरू झाला. पण त्यानंतर फक्त न फक्त केएल राहुल आणि विराट कोहलीचा 'खेळ' बघायला मिळाला. दोघांनीही डोळ्यांचे पारणे फिटतील असेच सदाबहार फटके मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. (Latest sports updates)
विराट आणि राहुलने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. मैदानाच्या चौफेर 'एक सौ एक' फटके मारले. पावसासारखेच ते दोघेही बरसत होते आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना त्यांच्याकडे निमूटपणे बघण्याशिवाय पर्याय नव्हता. डावाच्या अखेरपर्यंत विराट-राहुलच्या वादळी तडाख्यासमोर पाकिस्तानला सावरता आलं नाही. दुखापतीतून सावरलेल्या केएल राहुलनं सगळा अनुभव पणाला लावून शतक साकारलं. त्यानं नाबाद १११ धावा केल्या. तर विराटनं ९४ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या.
रोहित, शुभमन गिल यांची शानदार सुरुवात आणि त्यानंतर विराट कोहली, केएल राहुलची सदाबहार फटकेबाजी याच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर उभारला. निर्धारित ५० षटकांत २ बाद ३५६ धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी ३५७ धावांची गरज आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.