Ind vs Ban : रोहित शर्माचं आधी कौतुक, नंतर त्याच्या एका चुकीवर महान क्रिकेटपटूनं ठेवलं बोट

India Vs Bangladesh Latest Update : रोहित शर्माच्या धडाकेबाज खेळीचं कौतुक करतानाच त्याच्या एका चुकीवर महान क्रिकेटपटूनं बोट ठेवलंय.
India Vs Bangladesh, Rohit Sharma Latest News
India Vs Bangladesh, Rohit Sharma Latest NewsSAAM TV

India vs Bangladesh, Rohit Sharma : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या वनडे मालिकेत भारताची कामगिरी निराशाजनक झाली आहे. सलग दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. रोहित शर्मानं दुसऱ्या वनडेत शेवटपर्यंत झुंज दिली. पण तो विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात रोहित शर्मा हा नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. भारतीय संघाला त्यावेळी तो मैदानात असणे गरजेचे होते. अंगठ्याला दुखापत झालेली असताना त्यानं एकहाती किल्ला लढवला. त्यानं २८ चेंडूंत ५१ धावांची तुफानी खेळी केली. पण भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. (Cricket News)

अशात भारताचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी रोहितच्या खेळीचं कौतुक केलं. पण त्याचवेळी त्यांनी रोहितच्या एका चुकीवर बोट ठेवलं. जर रोहित शर्माला फलंदाजीलाच यायचं होतं तर, तो थोडा वरच्या क्रमांकावर का आला नाही, असा सवाल त्यांनी केला.

India Vs Bangladesh, Rohit Sharma Latest News
IND vs BAN : जखमी रोहित शर्मा शेवटपर्यंत नडला, पण पराभव टाळता आला नाही; अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशचा विजय

सुनील गावसकर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना म्हणाले की, 'रोहित शर्माच्या गुणवत्तेविषयी आणि त्याचा फलंदाजीचा क्लास आहे त्याबद्दल कुणालाही शंका नाही. पण दुसऱ्या सामन्यात भारत विजयाच्या समीप असताना रोहित शर्मा थोडा आधी का मैदानात फलंदाजीसाठी आला नाही? जर तो फलंदाजीसाठी नवव्या क्रमांकावर येऊ शकला तर, तो सातव्या क्रमांकावर का आला नाही? तो तसा करू शकला असता. अक्षर पटेल त्यावेळी थोडा वेगळा खेळ दाखवू शकला असता.'

India Vs Bangladesh, Rohit Sharma Latest News
Ind vs Ban : बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर रोहित शर्माचा खळबळजनक आरोप, म्हणाला....

'जेव्हा अक्षर पटेल मैदानावर होता, त्यावेळी दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर मैदानात आले. त्यावेळी कदाचित रोहित शर्मा मैदानात येणार नाही, असं त्याला वाटलं असावं. त्यामुळं तो फटकेबाजीच्या नादात बाद झाला. खरं तर त्या परिस्थितीत त्याला फटकेबाजी करण्याची आवश्यकता नव्हती. रोहित शर्मा मैदानात असता तर, कदाचित त्यानं वेगळी रणनीती आखली असती. तो ज्या पद्धतीनं खेळत होता, ते बघता निकाल वेगळा लागू शकला असता,' असं गावसकर म्हणाले. (Rohit Sharma)

दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. स्लिपला झेल घेण्याच्या प्रयत्नात त्याच्या हाताच्या अंगठ्यावर चेंडू लागला. अंगठ्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. तो तातडीनं मैदानाबाहेर गेला. त्याला रुग्णालयात जावं लागलं. फलंदाजीसाठी मैदानात टीम इंडिया उतरली. फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर आवश्यकतेनुसार, रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि अर्धशतकी खेळी केली. पण एकहाती किल्ला लढवताना तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

तिसरा सामना जिंकून टीम इंडिया शेवट गोड करणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे सामना चटगावमध्ये होणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक आहे. वनडे मालिकेचा शेवट गोड करण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल. पुढच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळं खेळू शकणार नाही, असे संकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहेत. दुसरीकडे गोलंदाज दीपक चाहर आणि कुलदीप सेनही संघात नाही. या तिघांची उणीव संघाला भासेल, यात शंकाच नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com