
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं जबरदस्त खेळ करत ४४५ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाची ही धावसंख्या मागील काही कसोटी सामन्यांतील सर्वोच्च होती. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडनं शतकी खेळ करून ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत पोहोचवलं होतं. या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियानं पकड मिळवली.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभव आणि तिसऱ्या कसोटीत पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियानं रचलेल्या धावांच्या डोंगराखाली टीम इंडियाचा संघ दबलेला होताच. हा दबाव घेऊन मैदानावर फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ पुन्हा ढेपाळला. आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक स्वस्तात माघारी परतले. अपवाद केवळ केएल राहुलचा होता. त्यानं ८४ धावांची झुंजार खेळी केली. पण त्याला एकाही आघाडीच्या फलंदाजाची साथ मिळू शकली नाही. जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, रोहित शर्मा हे पाच दिग्गज फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतले.
भारतावर पराभवाचे ढग दाटून आले होते. त्याचवेळी रविंद्र जडेजासारखा अनुभवी फलंदाज धावून आला. त्यानं ७७ धावांची सावध खेळी करत भारताच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. मात्र, दुसरीकडं फॉलोऑनचं संकट समोर आ वासून उभं होतं. तो बाद झाल्यानंतर फॉलोऑन मिळून भारतीय संघ पराभवाच्या छायेत जाणार इतकं मात्र नक्की होतं. कारण नीतीश रेड्डी आणि सिराज हे देखील स्वस्तात माघारी परतले होते.
अखेरची जोडी मैदानात होती. बुमराह आणि आकाश दीप हे दोघे मैदानात होते. ते माघारी परतले तर, पराभवाचे ढग आणखी गडद होणार होते. मात्र, त्यांनी टिच्चून आणि नंतर आकाश दीपनं एकेक सुरेख फटका मारत भारतावरील फॉलोऑनचे संकट टाळले. आकाश दीप २७ धावांवर, तर जसप्रीत बुमराह हा १० धावांवर खेळत आहे.
बुमराह आणि नवख्या आकाश दीपनं संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढलं असलं तरी, पाचव्या दिवशी काय होणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाचव्या दिवशी भारताच्या मदतीला पाऊस धावून येण्याची दाट शक्यता आहे. मागील चार दिवसांत फक्त १९२ षटके खेळवण्यात आली आहेत. बुधवारी म्हणजे अखेरच्या दिवशी २ मिमी ते २५ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. सकाळी आणि दुपारच्या सुमारास पाऊस पडू शकतो, असा अंदाज तेथील हवामान खात्याच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे.
भारत - ऑस्ट्रेलिया कसोटीच्या अखेरच्या म्हणजे पाचव्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया विजयासाठी शक्य तितके प्रयत्न करणार आहे. ज्या प्रमाणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसाचा खेळ झाला, तसंच स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडनं शतकी खेळी केल्या त्याप्रमाणे अखेरच्या दिवशी घडलं तर, ऑस्ट्रेलियाकडे विजयाची संधी अधिक आहे.
त्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना भारताचा अखेरचा फलंदाज लवकरात लवकर बाद करावा लागेल. तसेच २० षटकांचा खेळ करून, साधारण ३०० धावांचं आव्हान भारतासमोर उभं करावं लागेल. त्यानंतर उर्वरित ७० षटकांत भारतीय फलंदाजांना गुंडाळावं लागेल. तरच ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटी जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.