
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नुकताच भारतीय संघ जाहीर झाला. ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताचा 'मिस्टर ३६०' अशी ओळख असलेल्या सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यावर स्वतः सूर्यकुमार यादवनं प्रतिक्रिया दिली आहे.
भारताच्या १५ खेळाडूंच्या चमूत सूर्यकुमारला स्थान दिलं नाही. त्यावर त्यानं मनातील सल बोलून दाखवली आहे. याशिवाय त्यानं 'कटू असलं तरी सत्य' सांगितलं आहे. एकदिवसीय प्रकारात चांगली कामगिरी करू शकलो नाही, याची सल मनात आहे, असं तो म्हणाला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया बुधवारी, २२ जानेवारीपासून इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानात होणार आहे. त्याआधी सूर्यकुमार यादव यानं पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात निवड न झाल्याबद्दल विचारणा केली असता, त्यानं मनातील खदखद बोलून दाखवली.
मी वनडेमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही याची खंत आहे. जर मी चांगली कामगिरी करू शकलो असतो तर मी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या टीम इंडियात असतो. ज्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे, त्यांना स्थान मिळाला. तो त्यांचा हक्क आहे, असं सूर्यकुमार म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे, ती जबरदस्त आहे. या संघात जे खेळाडू आहेत, त्या सगळ्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी या फॉरमॅटमध्ये उत्तम कमगिरी केली आहे. अशा प्रकारचा संघ निवडला आहे, त्याचा आनंद आहे, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
सूर्यकुमार यादव मैदानाच्या चौफेर तुफानी फटकेबाजी करतो. सध्याच्या घडीला टी २० क्रिकेटमधला सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याला वनडेमध्ये क्षमतेप्रमाणं कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमारने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याला वनडे संघात खूप संधी देण्यात आली. पण अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यानं भारतीय संघासाठी ३७ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यात २५.७६ च्या सरासरीने ७७३ धावा केल्या आहेत. त्यात चार अर्धशतके आहेत. मात्र, वनडेमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १०५ पेक्षा जास्त आहे.
सूर्यकुमार यादव ७८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात ४०.७९ च्या सरासरीनं आणि १६७ च्या स्ट्राइक रेटनं २५७० धावा कुटल्या आहेत. आतापर्यंत ४ शतकं आणि २१ अर्धशतके ठोकली आहेत. एक कसोटी सामनाही तो खेळला आहे. त्यात अवघ्या ८ धावा करता आल्या. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात संधी न मिळाल्यानं माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानं प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाला मधल्या फळीत त्याची उणीव भासेल. सूर्यकुमार संघात असता तर तो एक्स फॅक्टर ठरला असता. आता संघाच्या तीन फलंदाजांवर जबाबदारी असेल. पण सध्या ते फॉर्मात नाहीत. पण सूर्यकुमार असा फलंदाज आहे की जो कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करू शकतो, असंही रैना म्हणाला होता.
सूर्यकुमार यादवला २०२६ मध्ये होणाऱ्या टी २० वर्ल्डकपसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर टी २० वर्ल्डकप स्पर्धेला अजून वेळ आहे. आम्ही एका वेळी एकाच मालिकेवर लक्ष केंद्रीत करतो, असं तो म्हणाला. याशिवाय मोहम्मद शमीची संघात वापसी झाल्यानं सूर्यकुमार आनंदी आहे. त्याच्यासारखा अनुभवी गोलंदाज संघात असणं नेहमीच गरजेचं असतं, असंही सूर्या म्हणाला.
मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो आता वापसी करत आहे. २०२३ मध्ये तो भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला होता. वनडे वर्ल्डकपमधील ती अंतिम लढत होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.