

post poll violence Bengal, TMC BJP clash : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका पार पडल्या. सत्ताधारी ममता बॅनर्जींचा पराभव करत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. पण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला अन् हत्यासत्र सुरू झाले. निवडणुकीनंतर आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचाही समावेश आहे. टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमुळे पश्चिम बंगाल धुसमुसत आहे, जाळपोळ, हत्या अन् हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. भाजप आणि टीमसीचे कार्यकर्ते अन् नेत्यांचा यात खून झाल्याची सांगण्यात येत आहे.
४ मे २०२६ रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपने २०० पेक्षा जास्त जागा जिंकून इतिहास रचला. तर सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. टीएमसीला ९० जागाही मिळवता आल्या नाहीत. या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेला हिंसाचार वाढतच चालला आहे. अनेक जिल्ह्यांमधून चकमकी आणि हत्यांच्या घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील मृतांची संख्या ५ इतकी झाली आहे.. दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा आणि बीरभूममध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. आतापर्यंत झालेल्या सहा हत्यांमध्ये भाजप आणि टीएमसी पक्षाचे ३-३ नेत्यांचा मृत्यू झालाय. यावरूनच सूडाच्या राजकारणाचे गंभीर चित्र दिसतेय.
भाजपच्या विजयानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या. याच संघर्षात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या झाली. यातील सर्वात भयानक अन् धक्कादायक म्हणजे सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या अज्ञात व्यक्तींनी केली. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे बुधवारी रात्री ही थरराक घटना घडली. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. तर हावडाच्या उदय नारायणपूर येथे दुसरी घटना घडली. भाजपाचा विजय साजरा करून परतत असताना ४५ वर्षीय यादव बोर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळी न्यू टाऊन परिसरात विजय मिरवणुकीदरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित मारहाणीत भाजप कार्यकर्ते मधू मंडल यांचा मृत्यू झाला. या हत्यांसाठी भाजपकडून टीएमसीला जबाबदार धरण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या काळात तृणमूल काँग्रेसच्या ३ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. बीरभूम जिल्ह्यातील नानूरमध्ये अबीर शेख यांची हत्या झाली. त्यानंतर परिसरात तणाव वाढला आहे. कोलकाताच्या बेलघाटा भागातील बिस्वजीत पटनायक यांची निवडणुकीतील वैमनस्यातून हत्या झाल्याचा आरोप आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग येथून शेख मुजीबुर यांचा मृतदेह सापडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्ते 'दक्षता न्याया'च्या नावाखाली निवडकपणे त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात येत आहे.
सर्व ६ घटनांनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ४५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हिंसाचार उफाळलेल्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर २४ परगणा, हावडा, कॅनिंग आणि बीरभूम या भागात सर्वाधिक हिंसक घटनांची नोंद आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वारंवार संघर्ष होत असल्याचे समोर आले आहे.काही ठिकाणी जाळपोळ आणि बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्याचेही वृत्त आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.